टेंभू पाणी योजनेच्या प्रतीक्षेत चौदा गावे

By Admin | Updated: September 18, 2015 23:10 IST2015-09-18T22:58:36+5:302015-09-18T23:10:05+5:30

कवठेमहांकाळची स्थिती : कामे अपूर्ण; केवळ घोषणाबाजी

Fourteen villages awaiting the Tembhu water scheme | टेंभू पाणी योजनेच्या प्रतीक्षेत चौदा गावे

टेंभू पाणी योजनेच्या प्रतीक्षेत चौदा गावे

लखन घोरपडे- देशिंग  कवठेमहांकाळ तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यापासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी टेंभू योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागे ही योजना पुरेशा निधीअभावी रखडली असून, या योजनेच्या लाभक्षेत्रातीन चौदा गावे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटावा, यासाठी आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे यांच्यासह नेत्यांनी ‘म्हैसाळ’पासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी टेंभू योजनेचा प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत ७८७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून ही योजना सुरू झाल्यास संपूर्ण कवठेमहांकाळ तालुका ‘म्हैसाळ’ व ‘टेंभू’च्या पाण्याने ओलिताखाली येणार आहेत.
टेंभू योजनेअंतर्गत कुंडलापूर, तिसंगी, नागाव, चोरोची रायवाडी, गर्जेवाडी, तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आठ गावांचा समावेश असून ही योजना वरदान ठरणारी आहे.
योजनेच्या प्रारंभापासून ते आजअखेरपर्यंत नेतेमंडळीं कडून केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तासगावमधील कार्यक्रमासाठी आले असता, टेंभू योजनेच्या पाहणी दौऱ्यानिमित्तच्या सभेत त्यांनी ५० कोटी जाहीर केले. मात्र अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.
या योजनेस २००१ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र २२ जानेवारी २००४ रोजी सुधारित प्रकल्प अहवालास २१०६.०९ कोटी रुपयांना शासनाने मान्यता दिली. यामध्ये तिसंगी घाटनांद्रे, कुंडलापूर उपसा सिंचन योजनेचाही समावेश करण्यात आला आहे. एकंदरीतच तालुक्यातील ‘म्हैसाळ’च्या पाण्याच्या ओलिताखाली येणारा भाग त्याचा लाभ घेत आहे, तर या पाण्यापासून वंचित राहिलेला परिसर योजना मंजूर असूनदेखील अर्धवट कामे, अपुरा निधी, तसेच प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे या भागाला पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
एकूणच या भागाला ‘टेंभू’चे पाणी मिळणार तरी केव्हा? असा सवाल आता येथील शेतकरी करू लागले आहेत. ही योजना त्वरित पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.


‘टेंभू’च्या लाभक्षेत्रातील गावे प्रतीक्षेत
तिसंगी, कुंडलापूर, नागज, ढालगाव, चोरीची, रायवाडी, घाटनांद्रे, गर्जेवाडी, वाघोली, दुधेभावी, ढोलेवाडी, जांभुळवाडी, चुडेखिंडी, कदमवाडी ही गावे लाभक्षेत्रात आहेत.
याबाबत प्रगतशील शेतकरी सखाराम घोदे म्हणाले, ढालगावसह परिसराला पाणी देण्यासाठी युती शासनाच्या काळात टेंभू योजना सुरू झाली. त्यानंतर आर. आर. पाटील यांनीही पूर्ततेसाठी प्रयत्न केले. परंतु सध्या या योजनेचे काम थांबले आहे. शिवाय या भागातील दुष्काळ हटवायचा असेल, तर योजना पूर्ण होणे गरजेचे आहे.

Web Title: Fourteen villages awaiting the Tembhu water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.