सांगलीतील चोवीस तास पाणी गेले कुठे?

By Admin | Updated: September 24, 2015 00:09 IST2015-09-23T22:08:44+5:302015-09-24T00:09:50+5:30

योजनेचा फियास्को : हवेवर फिरतात मीटर; महापालिकाच करते देखभाल-दुरुस्तीचे काम

Four days in Sangli, where water went? | सांगलीतील चोवीस तास पाणी गेले कुठे?

सांगलीतील चोवीस तास पाणी गेले कुठे?

 सांगली : सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्चून विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याचे महापालिकेचे स्वप्न भंगले आहे. चोवीस तास नव्हे, तर आता तास, दोन तासच पाणी नागरिकांना मिळत असून पाण्याचे बिल मात्र वारेमाप येत आहे. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी बिल भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यात ठेकेदारानेही देखभाल-दुरुस्तीचे काम थांबविल्याने महापालिकेलाच गळती व इतर कामे करावी लागत आहेत. महापालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीच्या सत्ताकाळात मोठा गाजावाजा करीत विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणी देण्याची योजना आखण्यात आली. राज्य शासनाच्या सुजल निर्मल योजनेतील सुमारे साडेआठ कोटीचा निधी या प्रकल्पावर खर्च करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेचे पुनर्वसन, बल्क मीटर बसविणे यासह दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचा ठेका एका कंपनीला देण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण शहरात पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा ठरावही महाआघाडीच्या काळात झाला होता. पण आता पाच वर्षानंतर या योजनेचा फियास्को झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार ग्राहकांना चोवीस तासांपैकी सकाळी तास ते दोन तास पाणी मिळते. ठेकेदाराचे बिलही महापालिकेकडे अडकले आहे. त्यामुळे त्याने देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी झटकली असून आता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडूनच देखभाल-दुरुस्ती केली जात आहे. पाण्याची गळती काढण्याच्या कामात ठेकेदाराने कुचराई केल्याचे प्रशासनाने सांगितले. त्याला वार्षिक फी दिली जात होती. त्यातही पालिकेने कपात केल्याचे सांगितले.
या योजनेतून चोवीस तास पाणी मिळत नसल्याने नागरिकांनीही बिले भरण्यास नकार दिला आहे. त्यात पाण्याचे मीटर हवेवर फिरत असल्याने नागरिकांना अवाच्या सवा बिले मिळत होती. त्याबद्दल संतापही व्यक्त झाला होता. तरीही महापालिका प्रशासनाने हवेवर मीटर फिरते, ही बाब कधी गांभीर्याने घेतलीच नाही. अखेर नगरसेवक प्रदीप पाटील यांनी तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील यांच्यासह विश्रामबागमधील मीटर्सची समक्ष पाहणी केली, तेव्हा हवेवर मीटर फिरत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाहिले होते. ही योजना यशस्वी होण्यासाठी पाण्याची टाकी सातत्याने भरलेली हवी; पण या योजनेवरील दोन्ही टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. दोन्ही टाक्यांना एक्स्प्रेस फिडरची आवश्यकता आहे. त्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नदीतून उचललेले पाणी, त्यानंतर जलशुद्धीकरण करून दिलेले पाणी यात मोठी तफावत आहे. जलशुद्धीकरणाचे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय नागरिकांना जादा पाणी देणे शक्य होणार आहे.
अशा तांत्रिक अडचणीत ही योजना अडकली आहे. चोवीस तास पाण्याचा पुरता बोजवारा उडाला असून, किमान चार तास तरी पाणी मिळावे, अशी अपेक्षा विश्रामबागकर करीत आहेत. (प्रतिनिधी)

प्रशासनाचे दुर्लक्ष
पाणी योजनेतून नागरिकांना चोवीस तास पाणी मिळत नाही. सकाळी तासभर पाणी येते. सायंकाळी पाणी मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. याबाबत प्रदीप पाटील यांनी ठेकेदार, अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती; पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट पाटील यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांनी बैठक घेतली. पुन्हा बैठकीचे नियोजन अद्यापपर्यंत झालेले नाही.


ठेका रद्दची मागणी
विश्रामबाग परिसरातील नगरसेवक प्रदीप पाटील यांनी पाणी योजनेचा ठेका रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्यात हवेवर मीटर फिरत असल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड बसतो. ही बिलेही वेळेवर दुरुस्त करून दिली जात नाहीत. मीटर बदलण्याची मागणी करून वर्ष झाले, तरी प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

Web Title: Four days in Sangli, where water went?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.