चार दिवस झाले तरी, फडणवीसांचा निरोप नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:56+5:302021-09-18T04:27:56+5:30
सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ...

चार दिवस झाले तरी, फडणवीसांचा निरोप नाही!
सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी दोन दिवसांत नेत्यांकडे निरोप देतो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र चार दिवस झाले तरीही फडणवीसांचा निरोप आलेला नाही. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार पाटील विरुद्ध भाजपमधील अन्य नेते अशी दुफळी पडली आहे. यामुळेच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल लांबणीवर पडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना पदाधिकारी बदल नको आहे. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे महापालिकेत झाले, ते जिल्हा परिषदेत होऊ नये, असे त्यांना वाटते. जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत. त्यांना सामोरे जातांना जिल्ह्याच्या सत्तेचे राजकीय केंद्र असलेली जिल्हा परिषद हातून जाऊ नये, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार त्यांनी पदाधिकारी बदल नकोच, अशी भूमिका फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे.
खासदार पाटील मात्र जिल्हा परिषदेतील बदलावर ठाम आहेत. भाजपच्या सदस्यांची नाराजी दूर करणे गरजेचे आहे. नाही तर आगामी निवडणुकीत याचा वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका खा. पाटील यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे चार दिवसापूर्वी फडणवीस यांनी दोन दिवसांत भाजप नेत्यांकडे निरोप देतो, सांगितले होते. पण, दोन दिवसांचे चार दिवस उलटून गेले तरी फडणवीसांचा निरोप आलेला नाही. यावरून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाणार की केवळ टोलवाटोलवी करून वेळ मारून नेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
चौकट
राजीनामे घेण्याबाबत निरोप नाही : पृथ्वीराज देशमुख
जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे पदाधिकारी बदलास विलंब झाला आहे. काही नाराज सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांनी जिल्ह्यातील नेत्यांना निरोप देतो, असे म्हटल्याचे त्या नाराज सदस्यांकडूनच समजले. अद्याप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्याबाबत कोणताच निरोप आलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.