भरदिवसा दहा फ्लॅट फोडले
By Admin | Updated: June 20, 2014 00:36 IST2014-06-20T00:32:28+5:302014-06-20T00:36:59+5:30
सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ : पाच लाखांचा ऐवज लंपास

भरदिवसा दहा फ्लॅट फोडले
सांगली : विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज, गुरुवारी दुपारी चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार अपार्टमेंटमधील दहा फ्लॅट फोडले. यामध्ये तीन ठिकाणी चोरटे यशस्वी झाले. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा एकूण पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकापाठोपाठ एक अशी घरफोड्यांची मालिकाच सुरू राहिल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. चोरटे मोटारीतून फिरत असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी जिल्हाभर नाकाबंदीचे आदेश दिले होते.
विश्रामबाग येथील उत्कर्ष अपार्टमेंटमध्ये अनिल यशवंत कुलकर्णी हे फ्लॅट क्रमांक तीनमध्ये राहतात. ते सकाळी नऊ वाजता कुटुंबासह तुंग (ता. मिरज) येथील शेतात गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील मंगळसूत्र, टॉप्स, नेकलेस, चांदीचे निरांजन, पाच हजारांची रोकड असा एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास केला. दुपारी दोन वाजता कुलकर्णी कुटुंबीय घरी परतले, त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. सायंकाळी त्यांनी फिर्याद दाखल केली.
तसेच शंभरफुटी रस्त्यावरील शालिनी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडले. यातील दोन फ्लॅटमध्ये त्यांचा चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र वादिराज जहागीरदार यांच्या फ्लॅटमधून त्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा लाखाचा ऐवज लंपास केला. नागराज कॉलनीतील श्रीकृष्ण हाईट्स अपार्टमेंटमध्येही तीन फ्लॅट फोडण्यात आले. यापैकी समीर मुजावर, इकबाल लतिफ यांच्या फ्लॅटमधील ऐवज चोरट्यांनी लंपास केला. अन्य एका फ्लॅटचा केवळ कडी व कोयंडा उचकटण्यात आला आहे. गुलमोहर कॉलनीतील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्येही दोन फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न झाला. विजयनगरमध्ये जे. जी. कुलकर्णी यांचा बंगला चोरट्यांनी फोडला. मात्र, काय ऐवज गेला, याची माहिती मिळू शकली नाही. दिवसभरात चोरट्यांनी चार अपार्टमेंटमधील दहा फ्लॅट फोडले असताना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात केवळ अनिल कुलकर्णी यांच्या फ्लॅटमध्ये झालेल्या चोरीचीच नोंद होती.
सहा वर्षांनंतर पुन्हा
सहा वर्षांपूर्वीही चोरट्यांनी शंभरफुटी रस्त्यावर दिवसभरात आठ फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. यातील एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. आज पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सहा वर्षांपूर्वी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून, गुन्ह्णाची पद्धत कशी होती, याची माहिती घेतली जात आहे. मुंबई, सोलापूर व पुणे पोलिसांशी संपर्क साधून एका दिवसात दहा ते बारा ठिकाणी घरफोडी करुन पसार होणाऱ्या गुन्हेगारांची माहिती मागविली आहे.
जिल्हत नाकाबंदी
घरफोड्यांची मालिकाच सुरु राहिल्याने पोलीसप्रमुख सावंत यांनी संपूर्ण जिल्हाभर नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्यानुसार दुपारी दोनपासून नाकाबंदी लावण्यात आली होती. संशयित सिल्व्हर रंगाच्या मोटारीचा शोध घेण्यात आला. या रंगाची मोटार दिसली की, थांबवून चौकशी केली जात होती. मात्र हाती काहीच लागले नाही.(प्रतिनिधी)