आधी महापौर बदल, मगच जिल्हा परिषदेत लक्ष घालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:58+5:302021-02-15T04:23:58+5:30
सांगली : आधी महापौरपदाचे बघतो, मगच जिल्हा परिषदेत लक्ष घालेन, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्हा ...

आधी महापौर बदल, मगच जिल्हा परिषदेत लक्ष घालणार
सांगली : आधी महापौरपदाचे बघतो, मगच जिल्हा परिषदेत लक्ष घालेन, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासंदर्भात भाजप सदस्य पाटील यांना भेटले. अध्यक्ष बंगल्यावर सकाळी सुमारे पाऊण तास चाललेल्या बैठकीत पाटील यांनी सर्व सदस्यांचे म्हणणे एकत्रित ऐकून घेतले.
पाटील यांनी प्रत्येक सदस्याला एकेकटे भेटण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण सदस्यांनी एकत्र म्हणणे मांडण्याची तयारी दर्शविली. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह सर्व विषय समित्यांच्या सभापतींनी सुरुवातीला पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर सदस्यांनी त्यांच्यापुढे एकत्रित म्हणणे मांडले. यावेळी पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी मात्र बाहेरच थांबून होते. सदस्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक गतिमान व्हायचे तर पदाधिकारी बदल झाला पाहिजे. सर्व सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे अस्वस्थता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे बदल करण्याशिवाय गत्यंतर नाही.
सदस्यांनी सांगितले की, कारभारात सुधारणा झाली नाही तर येत्या निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागेल. त्यासाठी पदाधिकारी बदल व्हायला हवा. जिल्हा परिषदेत अधिकारी मुजोर झाले असून, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातून जिल्हा परिषदेची राज्यभरात बदनामी होत आहे. जिल्हा परिषदेत सदस्यांनी यावे की नाही अशी स्थिती आहे. ही प्रतिमा उजळवायची तर तातडीने पावले उचलायला हवीत.
चर्चेत डी. के. पाटील, संग्रामसिंह देशमुख, रवी पाटील, सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, अरुण बालटे, संपतराव देशमुख, शोभा कांबळे, सुरेखा जाधव, सरिता कोरबू, शांता कनुजे आदी सदस्यांनी भाग घेतला. निवेदनही दिले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, या बैठकीपूर्वी कोअर कमिटीच्या सदस्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनीदेखील बदलासंदर्भात अनुकूलता दर्शविली आहे. सध्या महापौर बदलाची प्रक्रिया तोंडावर आहे. २२ फेब्रुवारीला त्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील बदलाविषयी चर्चा करू. २५ फेब्रुवारीस पुन्हा येणार आहे, तेव्हा त्याचा निर्णय होईल. एकाचवेळी दोन संस्थांमधील बदलाची चर्चा नको.
चौकट
शब्द दिलाय, पाळलाच पाहिजे
सदस्यांनी पाटील यांना सांगितले की, सध्याच्या पदाधिकारी निवडीवेळी वर्षभराची मुदत दिली होती. त्यानंतर बदल करण्याचा शब्द दिला होता. तो पाळायला हवा. सध्या वर्ष संपून गेल्याने बदलाचा विचार झाला पाहिजे. पाटील यांनी त्याला सकारात्मकता दर्शविली.