जबाबदारी स्वीकारून लढणार आणि जिंकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:11+5:302021-09-02T04:58:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आता वारसाहक्क न सांगता कर्तृत्वाच्या जोरावर पुढे जायचे आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून ...

जबाबदारी स्वीकारून लढणार आणि जिंकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आता वारसाहक्क न सांगता कर्तृत्वाच्या जोरावर पुढे जायचे आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून लढाई लढायची व जिंकायचीही आहे, असा निर्धार काँग्रेसचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला.
कृष्णाकाठावरील वसंतदादा स्फूर्तीस्थळावर बुधवारी सायंकाळी वसंतदादा गटाचा मेळावा पार पडला. महावीर बस्तावडे, सुभाष खोत, गणपतराव सावंत, उपमहापौर उमेश पाटील, अय्याज नायकवडी, बी. एन. पाटील, उदय पवार, करीम मेस्त्री, शैलजाभाभी पाटील, वहिदा नायकवडी, तुकाराम माळी, संजय हजारे, अमित पाटील, नगरसेवक मनोज सरगर, नगरसेविका शुभांगी साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सुरेश पाटील, श्रीमंत पांढरे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
विशाल पाटील म्हणाले की, पक्षाकडे मी कधीही जिल्हाध्यक्षपदाची मागणी केलेली नव्हती. राज्यातील कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मागणी केली होती. मोहनराव कदम यांना जिल्हाध्यक्षपदी ठेवण्यासाठी आमची संमती होती. बदल करायचा असेल, तर अन्य तालुक्याला संधी मिळावी इतकीच अपेक्षा केली होती. पक्षाने ती मान्य करून जतसारख्या दुष्काळी भागाला न्याय दिला आहे. आमदार विक्रम सावंत यांना पद मिळाले म्हणून आम्ही नाराज नाही. गटा-तटाच्या राजकारणात आम्ही शक्ती खर्च करणार नाही. पक्ष वाढला तरच आपले अस्तित्व आहे, याचे भान असल्याने पक्षवाढीसाठी यापुढे काम करू. प्रदेश उपाध्यक्षपद ही मोठी जबाबदारी आहे. या पदाच्या माध्यमातून राज्यभर काम करता येणार आहे. त्यामुळे हे पद मी स्वीकारत आहे.
चौकट
भाजपने लगेच ‘ऑफर’ दिली
प्रदेश उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर मी नाराज असेन, असा विचार करून लगेच भाजपच्या नेत्यांनी मला ‘ऑफर’ दिल्या; पण शेकडो अदानी, अंबानी निर्माण केले तरी वसंतदादांचे घराणे काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्टीकरण विशाल पाटील यांनी केले.
चौकट
अनुकंपा तत्त्वावरील हक्क संपला
विशाल पाटील म्हणाले की, नोकरीत आई-वडिलांच्या पश्चात एकाच मुलाला एकदाच अनुकंपा तत्त्व लागू होते. आमच्यात मोठे बंधू प्रतीक पाटील यांना तो फायदा मिळाला होता. आता माझा तो हक्क नाही. वारसाहक्काने नव्हे, तर कर्तृत्वाच्या बळावर पुढे जायचे आहे. त्याची तयारी केली आहे.
चौकट
नाराजी नको, एकोपा हवा
पक्षाने एखादे पद दिले नाही म्हणून कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. गट-तट न मानता पक्षातील सर्व आपलेच लोक आहेत, अशी भावना ठेवून पक्षवाढीसाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन विशाल पाटील यांनी यावेळी केले.