बारावीच्या परीक्षा तोंडावर, तरीही विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमाणपत्रे नाहीत; ग्रेस गुण बुडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:27 PM2024-01-31T16:27:37+5:302024-01-31T16:28:14+5:30

क्रीडा विभागाचा सावळा गोंधळ

Fear of loss of grace marks in 12th examination as students did not get sports certificates | बारावीच्या परीक्षा तोंडावर, तरीही विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमाणपत्रे नाहीत; ग्रेस गुण बुडण्याची भीती

बारावीच्या परीक्षा तोंडावर, तरीही विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमाणपत्रे नाहीत; ग्रेस गुण बुडण्याची भीती

विकास शहा

शिराळा : जिल्हा क्रीडा विभागातर्फे तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात‎ आल्या. त्याला बराच कालावधी लोटला, तरी अद्याप खेळाडूंना‎ प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. यामुळे दहावी,‎ बारावीतील खेळाडूंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विद्यार्थी खेळाडूंना या प्रमाणपत्राच्या‎ आधारे परीक्षेत ग्रेस गुण दिले जातात. पण प्रमाणपत्राअभावी ते‎ गुणांपासून वंचित राहण्याचा धोका‎ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची चिंता वाढली‎ आहे.‎ यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धेच्या‎ नियोजनात गोंधळाची स्थिती होती.‎ खूपच विलंबाने शासनाने स्पर्धांना मंजुरी दिली. त्यानुसार सप्टेंबरनंतर त्या झाल्या.‎ शालेय, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा स्तरावरून‎ विभागीय स्तरावर व पुढे राज्यस्तरावर स्पर्धा झाल्या. या स्पर्धा संपून वर्ष संपत आले, तरी यशस्वी झालेल्या व सहभाग घेतलेल्या‎ खेळाडूंना जिल्हा क्रीडाधिकारी‎ कार्यालयाकडून प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत.

बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू‎ होत आहेत. त्यानंतर दहावीच्याही होतील. त्यामुळे प्रमाणपत्र‎ तातडीने मिळण्याची गरज आहे. अन्यथा विद्यार्थी खेळाडू ग्रेस गुणांना‎ मूकण्याची भीती आहे. खेळाडूंना गुण‎ मिळण्यासाठी शाळांकडून परीक्षा मंडळाकडे प्रस्ताव वेळेत‎ सादर होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रमाणपत्राची गरज आहे.

किती मिळतात गुण‎?

सहावी ते दहावी किंवा‎ सहावी ते बारावीमधील खेळाडूला जिल्हास्तर प्रावीण्यासाठी ५ गुण मिळतात. विभागस्तर प्रावीण्यासाठी १०, राज्यस्तर प्रावीण्यासाठी १२ ते १५, राष्ट्रीयस्तर प्रावीण्यासाठी २० गुण मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ गुण दिले जातात.

यामुळे झाला विलंब‎ !

शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी राष्ट्रीय पातळीवर पेच निर्माण‎ झाला, त्यामुळे स्पर्धा घेण्यास विलंब झाला. सर्व स्पर्धा एकाच वेळी सुरू‎ झाल्या. तालुका व जिल्हास्तरावरील स्पर्धा संपेपर्यंत विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन सुरू झाले. त्यामुळे खेळाडूंना प्रमाणपत्र‎ वितरणास विलंब होत आहे.‎

Web Title: Fear of loss of grace marks in 12th examination as students did not get sports certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.