आबांच्या अखेरच्या पत्राने पाणावले अनेकांचे डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:16+5:302021-02-17T04:32:16+5:30
सांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना लिहिलेली एक चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल ...

आबांच्या अखेरच्या पत्राने पाणावले अनेकांचे डोळे
सांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना लिहिलेली एक चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकजण भावूक झाले. त्यात त्यांनी 'राज्यात काय चाललंय' हे वाक्य लिहिले होते.
आर. आर. पाटील यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने त्यांचे पुत्र रोहित पाटील व कन्या स्मिता पाटील यांनी आबांचे अखेरचे पत्र म्हणून सोशल मीडियावर एक चिठ्ठी शेअर केली. निधनापूर्वी चार दिवस अगोदर हात सुजले असताना त्यांनी एका कागदावर 'राज्यात काय चालले आहे' हे वाक्य लिहिले होते. हे पत्र फेसबुकवर टाकल्यानंतर अनेकांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याची भावना व्यक्त केली.
शेवटच्या क्षणापर्यंत आबांना राज्यातल्या जनतेविषयी असणारी काळजी चिठ्ठीत लिहिलेल्या त्या चार शब्दातून दिसते आहे. आबांच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा देण्यात आला. आबांच्या या हस्तलिखित चिठ्ठीची माहिती अनेक निकटवर्तीयांनाही नव्हती. रुग्णालयातील त्यांचे सर्व साहित्य घरी आणून ठेवण्यात आले होते. त्यामध्ये त्यांचा पेन, कपडे व अन्य साहित्य होते. त्यात ही चिठ्ठीसुद्धा होती. आबांच्या हातून लिहिले गेलेले हे शेवटचे वाक्य होते. त्यामुळे ते पाहून कुटुंबियांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहिले. आबांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील जनतेलाही त्यांची ही शेवटची चिठ्ठी दाखवावी, म्हणून त्यांच्या मुलांनी ती शेअर केली. अनेकांनी ती व्हायरल केली. दिवसभरात या चिठ्ठीची चर्चा होती. आबांच्या हस्ताक्षराचीही यानिमित्ताने चर्चा झाली. आबांचे हस्ताक्षर चांगले होते, मात्र शेवटच्या दिवसात हात सुजल्याने त्यांना ते वाक्य नीट लिहिता आले नाही, अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली.