शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला...

By Admin | Updated: November 23, 2015 00:30 IST2015-11-22T22:56:11+5:302015-11-23T00:30:07+5:30

द्राक्षबागायतदार हवालदिल : गारपिटीच्या शक्यतेने शेतकरी हबकला, चिंतेचे वातावरण कायम

Farmer's fault hits ... | शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला...

शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला...

सांगली : यंदाचा द्राक्ष हंगाम सुरू होण्यास अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी उरला असतानाच, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवल्याने जिल्ह्यातील शेतकरी हादरला आहे. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान होणार असून, हे वातावरण रब्बी हंगामासाठीही रोगाचे निमंत्रण ठरणार आहे.
जिल्ह्यातील मिरज पूर्वभाग, तासगाव, कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यातील द्राक्षबागांतील कामे सध्या अंतिम टप्प्यात असून, बहुतांश बागा फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. या बागांतील माल जानेवारीपासून बाजारात येण्याची शक्यता असते. फुलोऱ्याच्या स्थितीतील बागांसाठी सध्या निर्माण झालेले ढगाळ वातावरण कर्दनकाळ ठरले आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पाऊस झालेल्या तासगाव, मिरज पूर्वभाग, पलूस भागातील द्राक्षबागांवर रोगाची शक्यता अधिक असल्याने बागायतदारांनी औषध फवारणीस प्राधान्य दिले असले तरी, ढगाळ वातावरणानंतर लगेच पडणारे ऊन बागांतील रोग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. नरवाड (ता. मिरज) येथे शनिवारी रात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागा अडचणीत आल्या आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास सुरुवात होते. त्यात अनेक बागायतदारांचे पीक बाजारात येण्यास तयार आहे. नोव्हेंबर महिन्यात बाजारात येणाऱ्या द्राक्षांना गोडवा कमी प्रमाणात असला तरी त्याला मिळणारा दर लक्षात घेता, बहुतांश बागायतदार मोठा खर्च करून हंगामाच्या सुरुवातीलाच माल बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीनंतर होणाऱ्या अवकाळी पावसाने द्राक्षबागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
सध्या जिल्ह्यातील द्राक्षबागांचा आढावा घेतला असता, ६० टक्क्याहून अधिक बागा या फुलोऱ्याच्या स्थितीत आहेत. सध्याच्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्याच्या स्थितीतील बागांतील द्राक्षमण्यांची गळ, कूज वाढणार आहे. शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करुनही त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नसल्याने, फेबु्रवारीत बाजारात येणाऱ्या द्राक्ष उत्पादनात घट होणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यावर्षी द्राक्षबागांतील मशागतीची कामे सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला असला तरी, यंदा प्रथमच करपा, दावण्या यासारख्या रोगांपासून बागा वाचल्या होत्या. मात्र, या अवकाळीने बागा रोगांच्या कचाट्यात अडकणार आहेत.
जिल्ह्यातील द्राक्षबागांची ही स्थिती, तर मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या भाजीपाल्यासही या वातावरणाचा फटका बसणार आहे. जिल्ह्यात मिरज तालुक्यासह पाण्याची सोय असलेल्या भागात भाजीपाल्यास प्राधान्य देण्यात येते.
डिसेंबरपासून पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने बाजारात येणाऱ्या भाजीपाल्यांना दर चांगला मिळण्याची शक्यता गृहीत धरून वांगी, ढबू, दोडका, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी भाज्यांना अवकाळीमुळे रोगाची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा औषध फवारणीवरील खर्चही वाढणार आहे. मिरज पूर्वभागात सध्या ढबूचे अजूनही मोठे प्लॉट शिल्लक असल्याने व्यापाऱ्यांकडून अवकाळीचे कारण सांगून त्याला कमी दर देण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

दावण्याच्या प्रादुर्भावाची भीती
किर्लोस्करवाडी : पलूस तालुक्यात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार हबकला असून, बागांवर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पाऊस झाल्यास घड व करप्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे तालुक्यातील द्राक्षबागायतदार हवालदिल झाला असून, या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून द्राक्षबागायतदार औषध फवारणीत दंग असल्याचे चित्र आहे. चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागायतदारांना मागील वर्षी पीक छाटणीनंतर अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाल्याची आठवण झाल्यामुळे सध्या शेतकरी ढगाळ वातावरणाने दावण्या रोगाचा फटका बसू नये म्हणूनच उच्च दर्जाची व महागडी औषधे फवारणी करण्यात व्यस्त आहेत. सध्या तालुक्यातील आंधळी, मोराळे, बांबवडे, पलूससह सावंतपूर, कुंडल, सांडगेवाडी या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा फुलोऱ्यात असल्याने अशावेळी पाऊस झाल्यास घडांमध्ये पाणी साठल्यास घडकुज रोगाने द्राक्षबागेला धोका होऊ शकतो. पावसाचे पाणी घडांमध्ये साचून राहिल्यास मणीगळ होऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.


कवठेमहांकाळ तालुक्यातही चिंतेचे ढग
देशिंग : गेल्या दोन दिवसांपासून कवठेमहांकाळ तालुक्यासह खरशिंग, देशिंग, शिरढोण, हिंगणगाव, कुची, ढालगाव परिसरात ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील द्राक्षबागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. परिसरात ढगाळ वातावरणामुळे व गारव्यामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे; तर परिसरात अजून द्राक्षबाग फ्लॉवरिंग अवस्थेत असल्याने दावण्या रोगाचा झपट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हे हवामान रब्बी हंगामासाठी उपयुक्त असले तरी, द्राक्षबागांसाठी मात्र घातक आहे. अशावेळी पाऊस पडला तर द्राक्षघडांची पाकळी कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय दावण्या व इतर रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणीसाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. या हवामानामुळे तोटा सहन करावा लागणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

गेल्या आठवड्याभरापर्यंत द्राक्षबागांसाठी समाधानकारक असणारे वातावरण दोन दिवसांपासून बदलल्याने बागायतदारांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. यंदा प्रथमच जिल्ह्यातील बहुतांश द्राक्ष क्षेत्र दावण्या व करपा रोगापासून बचावले होते, मात्र आता या पावसाने व ढगाळ वातावरणामुळे बागायतदार अडचणीत आले आहेत. सोमवारपासून द्राक्षबागांवरील रोगाची तीव्रता कळण्यास सुरुवात होईल. फुलोऱ्याच्या स्थितीत जिल्ह्यातील मोठे क्षेत्र असल्याने याच बागांवर रोग वाढणार आहेत. शेतकऱ्यांनी डगमगून न जाता तज्ज्ञांच्या मदतीने औषध फवारणीचे नियोजन करावे
-सुभाष आर्वे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

Web Title: Farmer's fault hits ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.