‘तासगाव’च्या कामगारांचे नेत्यांकडून शोषण

By Admin | Updated: June 5, 2014 00:10 IST2014-06-05T00:10:34+5:302014-06-05T00:10:53+5:30

पैशावरून संघटनेत फूट : विड्रॉल पावतीवर घेतल्या सह्या

Exploitation by workers' workers of Tasgaon | ‘तासगाव’च्या कामगारांचे नेत्यांकडून शोषण

‘तासगाव’च्या कामगारांचे नेत्यांकडून शोषण

सांगली : तासगाव (तुरची) येथील साखर कारखान्यातील कामगारांना गेल्या नऊ वर्षांत थकित पगार न मिळाल्यामुळे त्यांचा न्यायालयीन लढा सुरु होता. अखेर कामगारांनी लढाई जिंकल्यामुळे त्यांच्या थकित पगार, ग्रॅच्युईटी, भविष्यनिर्वाह निधी आदीच्या थकबाकीची १८ कोटी ३३ लाख ७२ हजारांची रक्कम बँकेत जमा झाली. परंतु, काही स्वयंघोषित कामगार नेत्यांनी अवसायक मंडळातील काही मंडळींना हाताशी धरून, मिळणार्‍या या रकमेतून ६ टक्के रक्कम देण्यासाठी कामगारांकडे तगादा लावला आहे. एवढेच नव्हे, तर बँकेच्या कोर्‍या विड्रॉल पावतीवर त्यांच्या सह्या करून पैसे ढापण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व कामगारांकडून गोळा करण्यात येणारी रक्कम ८३ लाखांपर्यंत असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. तासगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तासगावच्या पश्चिमेचा भाग आणि पूर्ण पलूस तालुका येतो. उसाचे मुबलक क्षेत्र. कारखाना कृष्णा नदीपासून हाकेच्या अंतरावर. उत्तम प्रशासन असते आणि राजकीय हस्तक्षेप नसता, तर कारखाना आदर्शवत चालला असता़ पण, स्थापनेपासूनच राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या. यामध्ये कामगार पुरता होरपळून गेला आहे. गेल्या दहा वर्षात कामगारांचा वेळेवर पगार झाला नाही. अनेक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले, तरीही त्यांना थकित पगार, ग्रॅच्युईटी, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नव्हती. तरीही २००३-०४ मध्ये कामगारांनीच गळीत हंगाम घेऊन तो यशस्वी ठरविला. यावेळी एक लाख १० हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले होते. शेतकरी, वाहनधारकांचे पैसे देऊन स्वत: कामगार कमी पैशावर राबले. या कालावधीतील साखर विक्री करून १४ कोटी ५० लाख रूपये मुंबई उच्च न्यायालयाकडे ठेवण्यात आले होते. कामगारांचे थकित देणे भागविण्यासाठी न्यायालयातील रक्कम मिळावी, असा दावा उच्च न्यायालयात केला होता. त्यानुसार आॅक्टोबर २०१३ मध्ये न्यायालयाने बँकेतील रकमेतून प्राधान्यक्रमाने कामगारांची देणी भागविण्याची सूचना प्रशासनाला दिली होती. त्यानुसार ती रक्कम कामगारांसाठी मिळाली आहे. पण, ही रक्कम मिळविण्यासाठी आम्हीच प्रयत्न केल्याचा आव आणून स्वयंघोषित कामगार नेते कामगारांकडे पैशाची मागणी करू लागले आहेत. हंगामी कामगारांना दीड ते दोन लाख, तर नियमित कामगारांना दोन ते तीन लाखापर्यंत रक्कम मिळणार आहे. नियमित आणि हंगामी जवळपास सहाशे कामगार असून, यांच्याकडून स्वयंघोषित कामगार नेत्याने ६ टक्केनुसार पैशाची मागणी केली आहे. कामगारांकडून जवळपास ८४ लाख रूपये गोळा होणार आहेत. ही रक्कम गोळा करताना अवसायक मंडळातील काहींना हाताशी धरल्याची कामगारांमध्ये चर्चा सुरु आहे. कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या स्वयंघोषित नेत्याला आता कामगारांनीच आवर घालण्याची गरज आहे. कामगारांकडून बँकेच्या कोर्‍या विड्रॉल पावतीवर सह्या घेऊन नंतर शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर, ‘माझे कोणतेही देणे नाही, मी कुठेही तक्रार करणार नाही, पुन्हा पैसे मागणार नाही...’ आदीचे लेखी घेतले जात आहे. स्वयंघोषित कामगार नेत्याचा हा पराक्रम गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी त्या स्वयंघोषित नेत्याला अवसायक मंडळाने जवळ करू नये, असा सज्जड दमही दिल्याची चर्चा आहे. या स्वयंघोषित कामगार नेत्याला मंत्र्यांनी फटकारल्यामुळे त्याची चांगलीच पंचाईत झाली आहे. तरीही तासगाव तालुका सहकारी साखर कामगार संघ (इंटक) यांच्यामध्ये फूट पाडून आपली पोळी भाजून घेण्याचा या नेत्याचा प्रयत्न आहे. या नेत्याच्या कामगार संघटनेतील उचापतींना पदाधिकारीही कंटाळले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Exploitation by workers' workers of Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.