मृतदेहाची अदलाबदल, दोषींवर कारवाई होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:24+5:302021-03-08T04:25:24+5:30
सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्याचा प्रकार समोर आल्याने रुग्णालयातील सावळा ...

मृतदेहाची अदलाबदल, दोषींवर कारवाई होणार का?
सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्याचा प्रकार समोर आल्याने रुग्णालयातील सावळा गोंधळ समोर आला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी पूर्ण करून रविवारी अधिष्ठातांना अहवालही सादर केला असला तरी या प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार का? हा सवाल कायमच आहे.
शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कर्नाटकातील महिला रुग्णाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. याबाबतची माहिती कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना दिल्यानंतर काहीवेळाने मृतदेहही ताब्यात देण्यात आला. नातेवाईक मृतदेह घेऊन गावाकडे गेलेही. याचदरम्यान, एका पुरुष रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. थोड्यावेळानंतर महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्यात आल्याचे समजल्यानंतर धावपळ उडाली. अखेर त्या नातेवाइकांना वाटेतून परत येत मृतदेह बदलून घेऊन जावा लागला होता.
या गंभीर प्रकारानंतर रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ पातळीवरून याची गंभीर दखल घेत चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने रविवारी आपला अहवाल सादर केला आहे. त्यात प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल रविवारीच अधिष्ठातांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात नातेवाइकांनीही मृतदेह ताब्यात घेताना तो व्यवस्थित पाहून घेणे अपेक्षित होते, असेही नमूद करण्यात आल्याचे समजते.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, मृतदेह ताब्यात देताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत कोणतीही गांभीर्य दिसून आले नाही. त्यामुळे नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर दोषींवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला असला तरी, याबाबत सारवासारव होण्याचीच शक्यता अधिक व्यक्त होत आहे.
चौकट
अधिष्ठाता काय निर्णय घेणार
झालेल्या प्रकाराबाबत प्रशासन गंभीर असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तातडीने समिती गठीत करून अहवालही सादर करण्यत आला आहे. त्यामुळे आता अहवालानंतर अधिष्ठाता काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.