कोरोनाच्या संकटकाळातही घटल्या आत्महत्या, आजारपण व बेरोजगारीतही जगण्याची ऊर्मी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:49+5:302021-06-20T04:18:49+5:30
डमी स्टार ८२२ लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना व लॉकडाऊन काळात सर्वसामान्य माणसाच्या मागे संकटांचा ससेमिरा लागला. रोजगार ...

कोरोनाच्या संकटकाळातही घटल्या आत्महत्या, आजारपण व बेरोजगारीतही जगण्याची ऊर्मी कायम
डमी स्टार ८२२
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना व लॉकडाऊन काळात सर्वसामान्य माणसाच्या मागे संकटांचा ससेमिरा लागला. रोजगार गेला, उत्पन्नाचे स्रोत थांबले, कोरोनामुळे जवळच्या व्यक्ती सोडून गेल्या, शिवाय वैद्यकीय खर्चापोटी लाखोंच्या कर्जाचा डोंगरही झाला. या कठीण स्थितीला धीराने सामोरे जाण्याची क्षमता सर्वांकडेच नव्हती. मानसिकदृष्ट्या खचलेल्यांनी मृत्यूला कवटाळणे पसंत केले. सुटकेचा आपल्यापुरता मार्ग शोधला. पण गेल्या दोन वर्षांतील आत्महत्यांची तुलना करता कोरोनाकाळात आत्महत्या घटल्याचे आशादायी चित्र आहे.
गेल्या सहा महिन्यांतील १४० आत्महत्यांचे विश्लेषण केले असता हाराकिरी केलेल्या अनेकांच्या वेदनादायी कहाण्या समोर येतात. यामध्ये फक्त एका विशिष्ट वयोगटाचीच माणसे नाहीत. सळसळत्या रक्ताच्या तरुणापासून वयोमानाने खंगलेल्या आजी-आजोबापर्यंत अनेकांनी भरल्या संसारातून काढता पाय घेणे पसंत केले. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूपाठोपाठ अशा आत्महत्यांनीही अभ्यासकांना चिंतेत टाकले आहे. हे मृत्यू प्रत्यक्ष कोरोनाचे नसले तरी अप्रत्यक्षपणे कोरोनानेच बळी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे.
रोजगाराची साधने हरवल्याने आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे घाबरूनही काहींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. मिरजेच्या शासकीय कोविड रुग्णालयातच दोघांनी आत्महत्या केल्या. पुणे-बेंगलोरमधील बड्या पगाराच्या नोकऱ्या गमावल्याने काहींना नैराश्येने घेरले, त्यांनीही जगातून स्वत:ला मुक्त करून घेतले. बाजारपेठा बंद असल्याने शेतमालाचे काय करायचे, या चिंतेतून शेतकऱ्यांनीही विहिरी जवळ केल्या.
बॉक्स
द्या भावनिक आधार
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आत्महत्या ही प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. एक-दोन दिवसांत तडकाफडकी कोणीही आत्महत्येच्या टप्प्यावर पोहोचत नाही. आत्महत्येच्या भावना दररोज थोड्याथोड्या रुजत असतात. अशावेळी कुटुंबाचा भावनिक आधार महत्त्वाचा ठरतो. त्याचे एकटे पडणे धोकादायक ठरू शकते. यासाठी त्याच्याबरोबर सततचा संवाद कुटुंबीयांनी राखला पाहिजे. मोकळ्या होणाऱ्या मनातूनच आत्महत्येच्या भावनांचा निचरा होऊ शकतो.
बॉक्स
मित्रांनो, हे दिवसही जातील...
- आत्महत्येने तुमच्यापुरता विषय संपेल; पण तुमच्या पश्चात कुटुंबावरील संकट आणखी वाढेल हे लक्षात ठेवायला हवे.
- संकटात फक्त तुम्ही एकटेच नाही, अवघे जग चिंताक्रांत आहे. कदाचित तुमच्या संकटाची तीव्रता थोडी जास्त असेल इतकेच.
- पहिल्या लाटेनंतर सहा महिन्यांचा दिलाशाचा झरोका उघडला होता, तशीच दुसरी लाटही विरेल, चांगले दिवस नक्की येतील.
कोट
तज्ज्ञ म्हणतात, हळुवार मनाच्या व्यक्तींशी संवाद साधा
एखादी व्यक्ती आत्महत्या अचानक करत नाही. निराशेच्या किंवा संतापाच्या भावनेचा कडेलोट झाला की आत्महत्येपर्यंत पोहोचते. त्यापूर्वी ती सतत संकेत देत असते. नकारात्मक संदेश पाठवणे, नकारात्मक घटनांचा वारंवार उल्लेख करणे, कुटुंबाशी संवाद तोडणे असा प्रवास सुरू असतो. अशा स्थितीत कुटुंबीयांचा आधार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्याच्याशी सतत संवादाने भावना मोकळ्या होऊन तो आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतो.
- कालीदास पाटील, मानसोपचार तज्ज्ञ.
कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच घेरले आहे. अशा स्थितीत मानसिकदृष्ट्या दृढ राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शरीराच्या व्यायामासोबतच मनाचा व्यायामदेखील महत्त्वाचा आहे. वाचन, संगीत ऐकणे, छंद जोपासणे, कुटुंबाशी सतत संवाद साधणे हे त्यापैकीच काही मानसिक व्यायाम आहेत. आत्महत्येच्या मार्गावर निघालेल्या व्यक्तीला योग्य वेळी हेरून योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे.
- डॉ. आर. के. अडसूळ, निवृत्त विभागप्रमुख, मानसशास्त्र विभाग, गरवारे महाविद्यालय
ग्राफ
जिल्ह्यातील आत्महत्या
२०१९ - ६१६, २०२० - ५६७, जानेवारी ते मे २०२१ - १४०
पॉइंटर्स
या वयोगटात झाल्या आत्महत्या
२५ वर्षांपेक्षा कमी १५
२६ ते ४० वर्षे ५५
४१ ते ६० वर्षे ३७
६१ वर्षांपेक्षा जास्त ३३