‘विश्वास’मार्फत इथेनॉल प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:43+5:302021-09-25T04:27:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : साखर विक्रीला अनेक अडचणी येतात. त्यामुळे दोन-दोन वर्षांची साखर शिल्लक राहते. पुढीलवर्षी इथेनॉल प्रकल्प ...

Ethanol project will be set up through 'Vishwas' | ‘विश्वास’मार्फत इथेनॉल प्रकल्प उभारणार

‘विश्वास’मार्फत इथेनॉल प्रकल्प उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : साखर विक्रीला अनेक अडचणी येतात. त्यामुळे दोन-दोन वर्षांची साखर शिल्लक राहते. पुढीलवर्षी इथेनॉल प्रकल्प उभारून उत्पादन सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथे विश्वास कारखान्याच्या ५१ व्या ऑनलाईन वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, विश्वास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, सौ. सुनीता नाईक, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार नाईक म्हणाले की, साखरेची आधारभूत किंमत ३६०० पर्यंत होणे आवश्यक आहे, तरच उसाला चांगला दर देता येईल. साखर विक्रीवरील निर्बंध, दर यामुळे दोन दोन वर्षांची साखर शिल्लक राहते. यामुळे आर्थिक अडचणीस तोंड द्यावे लागते. त्यातूनच इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला आहे. कारखान्याची गाळप क्षमता ६००० टन, डिस्टिलरी प्रकल्पाची एक लाख लिटर, वीज निर्मिती प्रकल्प २१ मेगावॅट करण्यात येणार आहे.

ते म्हणाले की, महापुरामुळे नदीकाठाचे ऊस पाण्याखाली राहिले आहेत. त्यामुळे हा ऊस लवकर कसा तोडता येईल, याचा वेगळा आराखडा तयार करण्यात येईल. महापुरामुळे दरवर्षी नदीकाठावर नुकसान होते, त्यामुळे ११-१२ महिन्यांत ऊस उत्पादन करता येईल, अशा बियाणांचे संशोधन सुरू आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी संपूर्ण तालुक्यास या मार्चअखेर मिळेल.

कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीस वाचन केले. याप्रसंगी सुरेश चव्हाण, सम्राटसिंह नाईक, दीपाली नाईक, डॉ. शिमोनी नाईक, दत्तात्रय पाटील, दिनकर पाटील, विश्वास कदम, भूषण नाईक, अनिल पाटील, विजयराव नलवडे, युवराज गायकवाड, भानुदास पाटील, राजू पाटील उपस्थित होते. विजय थोरबोले यांनी सूत्रसंचालन केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.

चौकट

औद्योगिक शिराळ्यासाठी प्रयत्न

आ. नाईक म्हणाले की, औद्योगिक शिराळा म्हणून ओळख व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. याचबरोबर पर्यटनस्थळ विकास, राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची बिळाशी येथे उभारणी, भुईकोट किल्ला विकास यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Ethanol project will be set up through 'Vishwas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.