इथेनॉल निर्मितीमधून शेतकऱ्यांचे हित जपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:16+5:302021-01-01T04:19:16+5:30

इस्लामपूर : साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे. अशावेळी फायदेशीर ठरणाऱ्या उपपदार्थांची निर्मिती महत्त्वाची ठरते. इथेनॉल निर्मिती ...

Ethanol production will protect the interests of farmers | इथेनॉल निर्मितीमधून शेतकऱ्यांचे हित जपणार

इथेनॉल निर्मितीमधून शेतकऱ्यांचे हित जपणार

इस्लामपूर : साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे. अशावेळी फायदेशीर ठरणाऱ्या उपपदार्थांची निर्मिती महत्त्वाची ठरते. इथेनॉल निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यातून साखर कारखान्यांना दिलासा मिळू शकतो. साखराळे युनिटमध्ये दिवसाला ७८ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार असून वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये दिवसाला १ लाख ५० हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.

राजारामबापू साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, अतिरित साखर उत्पादन हा साखर उद्योगासमोरील मोठा प्रश्न आहे. साखर विकल्यावर पैसे मिळणार. तोपर्यंत प्रत्येक पोत्यास २५० ते २७५ रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसतो. एफआरपी १४ दिवसांच्या आत देणे कायद्याने बंधनकारक आहे. इथेनॉल ऑईल कंपनीस विकल्यावर १५ दिवसात पैसे मिळू शकतात.

पी. आर. पाटील म्हणाले, एक क्विंटल साखर तयार करायला ३३५० रुपये खर्च येत असून साखरेचा दर ३१०० रुपये आहे. क्विंटलला २५० चा घाटा आहे. साखरेचे उत्पादन वाढले, मात्र खप नाही. आपणास डिसेंबर महिन्यात १ लाख ७५ हजार क्विंटल साखर विक्रीचा कोटा मिळाला. मात्र त्यातील केवळ ६५ हजार क्विंटल साखरच विकली गेली आहे. साखरेला ३५०० रुपये दर मिळावा, ही आपली मागणी आहे. केंद्र सरकारने ३३०० चा दर जुलै महिन्यात जाहीर केला. अद्याप त्याची कार्यवाही नाही. एकरकमी एफआरपी देणे अडचणीचे झाले आहे. केंद्राकडून ९२ कोटी रुपयांचे येणे आहे.

कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सभापती शुभांगी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, अरुण कांबळे, छायाताई पाटील, सुस्मिता जाधव, शहाजी पाटील उपस्थित होते.

विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी- ३११२२०२०-आयएसएलएम-राजारामबापू न्यूज : राजारामबापू कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या प्रारंभ कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, प्रा. शामराव पाटील, अविनाश पाटील, सभापती शुभांगी पाटील उपस्थित होत्या.

Web Title: Ethanol production will protect the interests of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.