संघर्षयात्रीची अखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:26 IST2021-03-16T04:26:56+5:302021-03-16T04:26:56+5:30

‘आव्वाऽऽज कुणाचा?’ अशी आरोळी घुमली की, ‘संभाजीअप्पांऽऽचा!’ असं उत्तर आपसूक कार्यकर्त्यांच्या गर्दीतून यायचं. सांगलीतली कितीतरी आंदोलनं, मोर्चे आणि सभांमध्ये ...

The end of the struggle | संघर्षयात्रीची अखेर

संघर्षयात्रीची अखेर

‘आव्वाऽऽज कुणाचा?’ अशी आरोळी घुमली की, ‘संभाजीअप्पांऽऽचा!’ असं उत्तर आपसूक कार्यकर्त्यांच्या गर्दीतून यायचं. सांगलीतली कितीतरी आंदोलनं, मोर्चे आणि सभांमध्ये हे ठरलेलं. कारण तिथं केंद्रस्थानी असायचं, संभाजी हरी पवार तथा संभाजीअप्पा नावाचं वादळ. एकेकाळी गावभागाचा हा खमक्या नेता पुढं कष्टकऱ्यांचा, असंघटित वर्गाचा बुलंद आवाज बनला. विधानसभा गाजवीत राज्यभर चर्चेत राहिला. सहा-सात वर्षांपासून तब्येतीच्या तक्रारींशी झगडणारा हा संघर्षयात्री आता मात्र कायमचा विसावलाय...

सहा फुटांची कमावलेली तगडी देहयष्टी, नेहरू शर्ट-विजार, भेदक डोळे, कडक बोलणं ही अप्पांची वैशिष्ट्यं. १९८६ मधील पोटनिवडणुकीत वसंतदादांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील यांना अस्मान दाखवीत हा पहिलवान गडी पहिल्यांदा विधानसभेत पोहोचला. वसंतदादांच्या हयातीत त्यांच्या पुतण्याचा पराभव करणारा संभाजी पवार दिसतो कसा, हे पाहण्यासाठी विधानभवनात झुंबड उडाली होती. १९८६, १९९०, १९९५, २००९ अशी विधानसभेची चार मैदानं अप्पांनी मारली. दोनदा पराभवही पचवला. शिवसैनिक, नागरिक संघटनेचा नगरसेवक ते भाजपचा आमदार व्हाया जनता दल हा त्यांचा प्रवास त्यांच्या कुस्तीसारखाच रोमहर्षक होता. कारण यादरम्यानच्या राजकीय आखाड्यात त्यांनी वसंतदादा घराण्यातल्या विष्णूअण्णा पाटील, प्रकाशबापू पाटील आणि मदन पाटील या दिग्गजांना धोबीपछाड दिला होता.

सांगली शहरासह शेजारच्या हरीपूर, सांगलीवाडी, समडोळी, दुधगाव, नांद्रे, माधवनगर, बुधगाव या पट्ट्यात अप्पांचा कट्टर गट होता. सांगलीतला गावभाग हा त्यांचा बालेकिल्ला. नंतर हळूहळू व्यापारी पेठेसह हमाल-हातगाडीवाले, रिक्षावाले, रस्त्यावरचे छोटे विक्रेते, झोपडपट्टीधारक, भाजी विक्रेत्यांसाठी त्यांनी लढे उभारले. रस्त्यावरची लढाई केली. उपेक्षितांच्या प्रश्नांवर तुटून पडताना या असंघटित घटकांचे ते सेनापती बनले. सोबत तरण्याबांड पहिलवानांची फौज असे. त्यामुळं परिसरात आदरयुक्त दरारा तयार झाला.

अप्पा आधी बुलेटवरून फिरत. नंतर हिरव्या रंगाची जीप आली, तर कधी कार्यकर्त्याच्या मोटारसायकलीवरही मागे बसलेले दिसत. मतांची गणितं मांडत बेरजेचं राजकारण करताना अप्पांनी कार्यकर्ते घडविले. आज वेगवेगळ्या राजकीय पक्षांत स्थिरावलेले अनेक कार्यकर्ते अप्पांच्याच तालमीत तयार झालेत. संजय बजाज, शेखर इनामदार, आनंद परांजपे, ज्योती आदाटे, सुब्राव मद्रासी, बटूदादा बावडेकर ही त्यातली काही वानगीदाखल नावं. राजकीय स्थित्यंतरात काहींनी अप्पांना सोडलं; पण अप्पांनी कटुता ठेवली नाही.

जनता दलाचा आमदार म्हणून त्यांनी तीन टर्म गाजविल्या. मृणाल गोरे यांच्यानंतर या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले; पण व्यंकाप्पा पत्कींना विधान परिषदेवर संधी देण्याचा आग्रह धरल्यानं प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना बाजूला व्हावं लागलं. २००३ मध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांच्या निमंत्रणावरून ते भाजपमध्ये गेले. आमदारकी सांभाळत प्रदेश उपाध्यक्ष बनले. पुढं २०१४च्या दरम्यान प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीसाठी अप्पांनी मुलगा पृथ्वीराजसाठी उमेदवारी मागितली; पण भाजपनं संजयकाका पाटील यांना पक्षात घेऊन तिकीट बहाल केलं. नाराज झालेले अप्पा प्रचारातही उतरले नाहीत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीवेळीही त्यांना डावलण्यात आलं. संघर्षातून उभ्या ठाकलेल्या अप्पांनी पृथ्वीराजला शिवसेनेकडून उतरवलं...

पुलाखालून बरंच पाणी गेलंय. अप्पांचा गट पुन्हा भाजपसोबत आलाय; पण यादरम्यान अप्पांची पार्किन्सनशी झुंज सुरू झाली. मागच्या वर्षी परदेशातील उपचारानंतर बरे होऊन ते परतले होते. नंतर कोरोनाशीही दोन हात केले. सहा-सात वर्षांपासून तब्येतीच्या तक्रारींशी झगडणारा हा संघर्षयात्री आता कायमचा विसावलाय...

जयंतरावांशी ‘दोस्ताना’ संपला

संभाजीअप्पा खरे तर राजारामबापू पाटील यांचे शिष्य. त्यामुळे सध्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी त्यांचा जुना दोस्ताना. त्यातूनच अप्पा आणि जयंतराव सांगली महापालिकेत महाआघाडीच्या माध्यमातून एकत्र आले. महापालिकेत सत्ताही मिळवली. मात्र, सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकीवरून संघर्ष सुरू झाला आणि दोघांतील चाळीस वर्षांचा दोस्ताना संपला.

मारुती चौक आणि अप्पा

संभाजीअप्पांचं कार्यालय सांगलीच्या मारुती चौकात. हे साधं पत्र्याचं कार्यालय. इथं बसूनच अप्पांची साऱ्या सांगलीवर नजर असायची. कुणालाही सहजपणानं अप्पा या कार्यालयात भेटायचे. तिथं कार्यकर्त्यांचा अखंड राबता असायचा. आता ते सुनंसुनं झालंय.

Web Title: The end of the struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.