शिक्षकांच्या समस्यांसाठी शासनाकडे आग्रही
By Admin | Updated: November 23, 2014 23:56 IST2014-11-23T23:15:26+5:302014-11-23T23:56:42+5:30
काळुजी बोरसे-पाटील : शिक्षक समितीचे मिरजेत त्रैवार्षिक अधिवेशन

शिक्षकांच्या समस्यांसाठी शासनाकडे आग्रही
लिंगनूर : शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक समिती आग्रही आहे. १ ली ते ७ वीच्या प्रत्येक शाळेस मुख्याद्यापक, विषय शिक्षकांना ४३०० ची वेतनश्रेणी, अंशदान योजनेत शासनाचे दान (वाटा) भरावयासाठी पाठपुरावा करणे यासह राज्यातील तमाम शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री व राज्य शासनाकडे नेटाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष काळुजी बोरसे-पाटील यांनी केले.
ते आज मिरज येथील शेतकरी भवनातील सभागृहात आयोजित शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
बोरसे-पाटील म्हणाले, राज्यातील आंतरजिल्हा बदलीत सुलभता यावी म्हणून राज्याचे रोष्टर बनवून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. १ ली ते ५ वी साठीही पदवीधर अध्यापक मिळाला पाहिजे, अंशदान योजनेत केवळ १ नोव्हेंबरनंतरच्या शिक्षकांच्या पगारातून कपाती सुरू आहेत; मात्र शासनाने आपला वाटा खात्यावर वर्ग केलाच नाही. त्यासाठी राज्य शासनाच्या अर्थ विभागाकडे तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मिरज तालुक्याची कार्यकारिणी अशी : तालुका नेते - हरिभाऊ गावडे, अध्यक्ष-कुबेर कुंभार, सरचिटणीस-सुरेश नरुटे, कार्याध्यक्ष-विकास चौगुले, उपाध्यक्ष-सहदेव बागी, सुभाष ओमासे, तात्यासाहेब बंडगर आदींची निवड केली. (वार्ताहर)
शिक्षक बँकेचे रणशिंग
याच त्रैवार्षिक अधिवेशनात आज शिक्षक बॅँकेच्या संचालक मंडळाने सर्व प्रकारच्या कर्जावरील दर अर्ध्या टक्क्याने कमी केला असल्याचे जाहीर केले; तर विरोधक करीत असलेल्या आरोपांवर विश्वास न ठेवता सभासदांनी योग्य पडताळा जरूर करावा, असे आवाहन करीत किरण गायकवाड यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.