वीज कंपनीला १२ कोटींचा ‘शॉक’
By Admin | Updated: June 1, 2015 00:20 IST2015-05-31T23:27:14+5:302015-06-01T00:20:57+5:30
वादळी फटका : १६८ फिडर बंद; सहाशे गावांचा वीज पुरवठा खंडित

वीज कंपनीला १२ कोटींचा ‘शॉक’
अंजर अथणीकर - सांगली -जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसाने वीज कंपनीचे जवळपास १२ कोटींचे नुकसान झाले. या वादळी पावसाने १६८ एक्स्प्रेस फिडर बंद पडले. त्यामुळे जवळपास सहाशे गावे व वाड्या-वस्त्यांमधील वीज पुरवठा खंडित झाला. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करुन जवळपास सर्वच गावांतील वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. आता कर्मचारी कृषी क्षेत्रातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणखी दोन दिवसात सर्वच ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे लोखंडी व सिमेंटचे खांब मोडून पडले. झाडे उन्मळून पडल्याने वायरी तुटल्या. एक्स्प्रेस फिडर खराब झाले. सर्वाधिक फटका कवठेमहांकाळ तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात लघुदाब वाहिनीचे १५ खांब व उच्च दाब वाहिनीचे तीन खांब मोडून पडले आहेत. प्रत्येक तालुक्यात चार ते पाच खांब मोडून पडले आहेत. झाडे व त्यांच्या फांद्या तुटून पडल्याने शंभरहून अधिक ठिकाणी वायरिंग तुटले आहे.
सांगलीमध्ये मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरात, विश्रामबाग गणपती मंदिरासमोरील झाड विजेच्या तारांवर कोसळले. त्याचबरोबर त्रिकोणी बागेजवळील झाडाची मोठी फांदी इलेक्ट्रीक खांबावर पडल्याने चारही बाजूच्या विजेच्या तारा तुटल्या. अद्याप या परिसरातील खांब उभारणी व वायरिंग दुरुस्ती सुरु आहे.
वादळी पावसाने जिल्ह्यातील ११ के.व्ही.चे १६८ फिडर बंद पडले आहेत. एका फिडरवरून जवळपास चार ते पाच गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जवळपास सहाशेहून अधिक गावे व वाड्या-वस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होता.
प्रथम शहर भागातील, त्यानंतर ग्रामीण व त्यानंतर कृषी क्षेत्रातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. आता सर्वच गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
निवृत्तीनंतरही सेवा...
वीज कंपनीचे १९ कर्मचारी आज (रविवार) सेवानिवृत्त झाले. हे निवृत्त होणारे कर्मचारीही आज विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. शुक्रवारी रात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले. त्यामुळेच विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्यास मदत झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पी. एम. राठोड यांनी दिली.