शेटफळेत दिघंची-हेरवाड महामार्गाच्या मध्येच विद्युत पोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:21+5:302021-09-19T04:27:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे राजपथ कंपनीने दिघंची-हेरवाड महामार्गाचे काम करताना विजेचे खांब तसेच रस्त्यामध्ये ...

शेटफळेत दिघंची-हेरवाड महामार्गाच्या मध्येच विद्युत पोल
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे राजपथ कंपनीने दिघंची-हेरवाड महामार्गाचे काम करताना विजेचे खांब तसेच रस्त्यामध्ये ठेवून आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. पोलवर विद्युत पुरवठाही सुरू असल्याने मोठी दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
शेटफळे गावातून जात असणारा हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा असून दोन्ही बाजूस मोठ्या गटारी आहेत. काही ठिकाणी अजून गटारांचे बांधकाम अर्धवटच आहे. याशिवाय सिमेंट काँक्रीट रस्ता करत असताना रस्त्याच्या मध्ये येत असणारे महावितरणचे विद्युत खांब बाजूला स्थलांतरित करून रस्ता करणे गरजेचे होते. मात्र, राजपथ कंपनीने हे खांब तसेच रस्त्यामध्ये ठेवले आहेत.
विद्युत खांब स्थलांतरित करून घेण्यासाठी महावितरणने राजपथ कंपनीला रीतसर नोटीस पाठवत अंदाजपत्रक बनवून खांब स्थलांतरित करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, आजअखेर राजपथ कंपनीने विद्युत खांब स्थलांतरित केले नाहीत.
चौकट
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिरज कार्यालयाकडे या महामार्गच्या कामाची जबाबदारी आहे. मात्र, तेथील अभियंता संतोष रोकडे हे या कामाकडे कधीही फिरकलेच नाहीत. सिमेंट काँक्रीट रस्ता बनवण्यापूर्वीच विद्युत खांब स्थलांतरित करून मगच काम करायला हवे होते; मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.