जतमधील आठ गावांना टॅँकरने पाणी
By Admin | Updated: June 1, 2015 00:21 IST2015-05-31T23:23:35+5:302015-06-01T00:21:54+5:30
दहा टँकर सुरू : शासनाकडून अत्यल्प पाणीपुरवठा; माणसी चाळीस लिटरची मागणी

जतमधील आठ गावांना टॅँकरने पाणी
जयवंत आदाटे -जत -तालुक्यातील ८ गावे व त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवरील ३५ हजार १२० नागरिकांनी प्रतिदिवस दहा टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. शासनाकडून होत असलेला पाणीपुरवठा अत्यल्प असून, २० लिटर पाण्यातून दैनंदिन गरज पूर्ण होत नाही. शासनाने या नियमात बदल करून माणसी चाळीस लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी टॅँकर सुरू असलेल्या गावातील नागरिकांमधून होत आहे.
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. विहिरी, तलाव, नाले, विंधनविहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रत्येकवर्षी २५ मे अखेरपर्यंत एक-दोन मोठे अवकाळी पाऊस होत होते. यावर्षी काही भागातच तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे. उर्वरित भागात पाऊस झाला नाही.
मे महिन्यातील अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणात बदल होऊन पश्चिमेकडून -पूर्वेकडे जोरदार गार वारे वाहत होते. याशिवाय उन्हाची तीव्रता कमी होऊन आकाशात सतत काळे ढग तयार होत होते. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी होती; परंतु यावर्षी मे महिना संपत आला असता तरी जत तालुक्यातील वातावरणात बदल झाला नाही. हवेतील उष्णता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात वाढ होऊ लागली आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर, येथील पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाला टॅँकरच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे, अशी भीती येथे व्यक्त केली जात आहे.
खोजानवाडी, उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, काराजनगी, उटगी, बिळूर ही आठ गावे आणि त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवर दहा टॅँकरच्या २७ खेपा प्रशासनाने मंजूर केल्या आहेत. दहा टॅँकरपैकी चार टॅँकर शासकीय, तर सहा टॅँकर खासगी आहेत. खासगी टॅँकरची क्षमता बारा हजार लिटर, तर शासकीय टॅँकरची क्षमता दहा हजार लिटर इतकी आहे. नादुरुस्त टॅँकर, लांब अंतरावरील पाणी उद्भव ठिकाण, वीज दाबनियमन व गळके टॅँकर यामुळे मंजूर २७ पैकी २५ किंवा २६ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे.
शासकीय नियम प्रतिमाणसी वीस लिटर इतका असला, तरी प्रत्यक्षात पंधरा ते अठरा लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. शासन निर्मलग्राम, स्वच्छता अभियान व हागणदारीमुक्त गाव या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. प्रतिमाणसी वीस लिटर पाण्यातून दैनंदिन गरजा पूर्ण करून आम्ही शासकीय योजनांची कशी अंमलबजावणी करणार, असा प्रश्न अमृतवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल पवार यांनी उपस्थित केला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून टंचाई कालावधित वीज लिटर प्रतिमाणसी पाणी पुरवठा करावा, असा जुना शासकीय नियम आहे. या नियमात आता शासनाने बदल करावा किंवा लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
मंजूर खेपांपेक्षा कमी पाणी
खोजनवाडी, उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, काराजनगी, उटगी, बिळूर ही आठ गावे आणि त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवर दहा टॅँकरच्या २७ खेपा प्रशासनाने मंजूर केल्या आहेत.
नादुरुस्त टॅँकर, लांब अंतरावरील पाणी उद्भव ठिकाण, वीज दाबनियमन व गळके टॅँकर यामुळे मंजूर २७ पैकी २५ किंवा २६ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे.