जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा; बहुरंगी लढतींचे संकेत
By Admin | Updated: November 9, 2016 23:26 IST2016-11-09T23:26:40+5:302016-11-09T23:26:40+5:30
बहिष्कारामुळे शिराळाची निवडणूक स्थगित : इस्लामपुरात राष्ट्रवादीसमोर विरोधकांचे कडवे आव्हान; तासगावमध्ये भाजपला सशक्त पर्याय देण्याचा प्रयत्न

जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा; बहुरंगी लढतींचे संकेत
श्रीनिवास नागे ल्ल सांगली
जिल्ह्यात पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि एकच धुमशान सुरू झाले. त्यातील शिराळ्याच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातल्याने तेथील निवडणूक स्थगित झाली. मात्र, बाकीच्या शहरांत निवडणुकीचा धुरळा उडू लागला आहे.
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या इस्लामपूर शहरावर गेली ३० वर्षे राष्ट्रवादीचे नेते,
माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची मांड कायम आहे. नगरपालिकेत विरोधकांना कधीच एकत्र येऊ न देण्याचे जयंतरावांचे कसब यंदा मात्र फोल ठरले आहे. विकास आघाडीच्या रूपाने काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय आणि स्वाभिमानीची
घट्ट मोळी बांधून जयंतरावांच्या राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान उभे करण्यात आले आहे. शिवाय तिसरी आघाडीही जनमत अजमावत आहे.
सुवर्णनगरी विटा शहरावर ४० वर्षे पाटील घराण्याची
सत्ता कायम आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव नगरपालिकेची सूत्रे हलवतात. यंदा शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाने त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. भाजप आणि रासपनेही येथे शड्डू ठोकला आहे.
आष्टा नगरपालिकेवर वर्षानुवर्षे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे गटाची मजबूत पकड आहे. गेल्या दोन निवडणुकांपासून आ. जयंत पाटील गटाने त्यांच्याशी जुळवून घेतल्याने बलदंड राष्ट्रवादीला तुल्यबळ विरोधक राहिले नाहीत. मात्र, यंदा इस्लामपूरसारखा ‘राष्ट्रवादी विरुद्ध सगळे’ असा प्रयोग शहर लोकशाही आघाडीच्या माध्यमातून विरोधकांनी केला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव नगरपालिकेच्या राजकारणाने कूस बदलली. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाची सत्ता पालिकेत आली. मात्र, यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करून भाजपला सशक्त पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपमधील बंडखोरी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी किंवा बिघाडी यावर येथील समीकरणे अवलंबून राहतील.
पलूसमध्ये यंदा नव्यानेच नगरपालिका उदयास आली. येथे काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांच्या गटाविरोधात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बापूसाहेब येसूगडे यांनी रयत आघाडीचे उमेदवार उतरवले आहेत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपचेही उमेदवार स्वतंत्र लढत आहेत, तर क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड आणि युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांनी राष्ट्रवादीची मोट पुन्हा बांधून रिंगणात उडी घेतली आहे.
पतंगराव कदम यांचे ‘होम टाऊन’ असलेल्या कडेगावात सात महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. नऊ विरुद्ध आठ अशा काठावरील बहुमताने काँग्रेसचा झेंडा लागला होता. आता नगरपंचायत निवडणुकीत कदम यांच्या काँग्रेस टीमविरोधात त्यांचे पारंपरिक विरोधक पृथ्वीराज देशमुख यांच्या भाजप आघाडीने दंड थोपटले आहेत.
कवठेमहांकाळच्या पहिल्या नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचे विजय सगरे आणि गजानन कोठावळे यांनी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्या पॅनेलविरोधात काँग्रेसची ‘एकला चलो रे’ अशी भूमिका असून, या दोन्ही पॅनेलमधील नाराजांसह स्वत:च्या गटातील शिलेदार एकत्र करण्यावर खासदार संजय पाटील यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
नव्याने निर्माण झालेल्या खानापूर नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसमधील
राजेंद्र माने आणि सुहास शिंदे
यांची दोन स्वतंत्र पॅनेल आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर
यांचे पॅनेल, असा मुकाबला येथे होत आहे.
जिल्ह्यात अर्ज माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत (दि. ११) अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने त्यानंतरच लढतींचे चित्र अधिक सुस्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष लढती होणार लक्षवेधी
यंदा थेट नगराध्यक्ष निवड होत असून, इस्लामपुरात राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना विकास आघाडीचे निशिकांत पाटील आणि तिसऱ्या आघाडीचे प्राचार्य विश्वास सायनाकर टक्कर देत आहेत. विट्यात काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या स्नुषा प्रतिभा पाटील आणि आमदार अनिल बाबर यांच्या स्नुषा शीतल बाबर यांच्यात सामना होत आहे. तासगावात तर राष्ट्रवादीचे संजय सावंत यांच्याविरोधात भाजपने त्यांचेच सख्खे बंधू विजय सावंत यांना उतरवले आहे. या तिन्ही लढती लक्षवेधी होणार आहेत.