‘राजारामबापू’मुळेच नदी प्रदूषित

By Admin | Updated: May 26, 2015 00:57 IST2015-05-25T23:45:06+5:302015-05-26T00:57:48+5:30

रघुनाथदादांचा आरोप : प्रदूषण नियंत्रणची गांधारीची भूमिका

Due to Rajarambapu, the river is polluted | ‘राजारामबापू’मुळेच नदी प्रदूषित

‘राजारामबापू’मुळेच नदी प्रदूषित

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे मळीमिश्रित दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळेच नदीतील मासे मृत झाले आहेत. कारखान्यांचे दूषित पाणी सांगलीतील लाखो जनतेला प्यावे लागत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गांधारीची भूमिका घेऊन जनतेच्या जिवाशी खेळत आहेत, असा आरोप शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी न घेताच को-जनरेशन आणि कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम सुरु केल्याबद्दल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी, वीज आणि बँक खाती सील का करू नयेत, अशी नोटीस दि. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी पाठवूनही, प्रदूषण नियंत्रणच्या सांगलीतील अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याची टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी थेट कृष्णा नदीत सोडले जात आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्या कारखान्यांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सांगली आणि कृष्णा नदीकाठच्या गावांतील लाखो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रण कोणत्या कारखान्यामुळे होत आहे, हेही प्रदूषण नियंत्रण अधिकारी जनतेला सांगू शकत नाहीत. एवढा राजकीय दबाव अधिकाऱ्यांवर असेल, तर ते जनतेची सेवा कशी करणार? सांगलीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कऱ्हाड तालुक्यातील साखर कारखान्यांची नावे घेऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून आम्ही कोल्हापूर विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांकडून धक्कादायक माहिती मिळाली. राजारामबापू साखर कारखान्याकडून दूषित पाणी होत असतानाही तेथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना न घेताच कारखान्यामध्ये को-जनरेशन आणि क्षमता वाढविण्यासाठी विस्तारिकरणाचे काम सुरु असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी आढळून आले आहे. याबद्दल विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखान्यास दि. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी नोटीस बजावून, प्रदूषण नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारखाना बंद का करू नये, तसेच वीज, पाणी पुरवठा बंद का करू नये आणि तुमची बँक खाती सील का करू नयेत, असे ताशेरे ओढले आहेत, असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीतील मुद्दे
राजारामबापू कारखान्याने को-जनरेशन आणि कारखाना विस्तारिकरणासाठी परवाना न घेताच काम सुरू केल्याबद्दल कारखाना बंद का करू नये.
तुमच्या कारखान्याची वीज, पाणी बंद करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना का देऊ नये
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचे पालन करीत नसल्यामुळे बँक खाती सील का करू नयेत.

Web Title: Due to Rajarambapu, the river is polluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.