ताकारीचे आवर्तन लांबल्याने पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST2021-02-17T04:31:41+5:302021-02-17T04:31:41+5:30

देवराष्टे : ताकारी उपसा जलसिंचन योजनेतून सोडण्यात आलेले यंदाचे पहिले पाणी बंद होऊन महिना उलटल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली असून, ...

Due to the long cycle of Takari, the crops started growing | ताकारीचे आवर्तन लांबल्याने पिके करपू लागली

ताकारीचे आवर्तन लांबल्याने पिके करपू लागली

देवराष्टे : ताकारी उपसा जलसिंचन योजनेतून सोडण्यात आलेले यंदाचे पहिले पाणी बंद होऊन महिना उलटल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली असून, विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी बारमाही बागायतीसह रब्बी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. ताकारी योजनेचे पाणी तत्काळ सोडून पिकांना वाचविण्याची मागणी कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांमधून होत आहे.

ताकारी योजनेचे यावर्षीचे पहिले पाणी डिसेंबरला सुरु झाले होते. कालव्याच्या एकूण १३० किलोमीटर(विसापूर-शिरगाव ता. तासगाव)पर्यंतच्या लाभक्षेत्राला पाणी पुरविले होते. शिवाय टप्पा तीनमधून सोनहिरा खोऱ्यातील शेतीसाठी पाणी सोडले होते. तिसऱ्या टप्प्याचे हे पहिले आवर्तन जानेवारीमध्ये बंद करण्यात आले. परंतु, मुख्य कालव्यातून वाहणारे पाणी बंद होऊन महिना उलटला आहे. कडाक्याचा उन्हाळा आणि लाभक्षेत्रात वाढलेल्या सिंचन क्षेत्रासाठी जमिनीतून प्रचंड पाणीउपसा होत आहे. परिणामी लाभक्षेत्रात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे. पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने पिके वाळू लागली आहेत.

नियमित बारमाही पिकांसह रब्बी हंगामातील पिकांसाठी जमिनीतून दैनंदिन भरमसाठ पाणीउपसा होऊ लागला आहे. महिनाभरापूर्वीच ओढे आटले आहेत. सततच्या उपशामुळे विहिरींतील पाणी निघू लागले आहे. उथळ भागातील विहिरी सांगळ्यावर आल्या असून, बहुतांश बोअरवेलचे पाणीही गायब झाले आहे. पाटबंधारेने दुसऱ्या पाणी आवर्तनाचे नियोजन तत्काळ करुन चार दिवसात पाणी सोडल्यास पिकांची होरपळ आणि होणारे संभाव्य नुकसान टळणार आहे. याबाबत पाटबंधारेने गांभीर्याने घेऊन तत्काळ पाणी चालू करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Due to the long cycle of Takari, the crops started growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.