‘वडाप’सह चालक झाला गायब
By Admin | Updated: September 12, 2016 00:20 IST2016-09-12T00:20:47+5:302016-09-12T00:20:47+5:30
पोलिसांकडून शोध : मोबाईल नदीतच; मुंबईतील पाणबुड्यांशी संपर्क

‘वडाप’सह चालक झाला गायब
सांगली : येथील गवळी गल्लीतील गुंड मिलिंद ऊर्फ मिंच्या गवळी याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यासाठी लाकडे नेलेला सांगलीवाडीतील वडापचालक ‘वडाप’सह गायब झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असले तरी, अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. दरम्यान, मिंच्याचा मोबाईल कृष्णा नदीत असल्याचे जीवरक्षक टीमच्या पाण्यातील कॅमेऱ्यामुळे दिसून आले आहे. पण तो काढण्यात अडथळे येत असल्याने, पोलिसांनी मुंबईतील पाणबुड्यांशी संपर्क साधला आहे.
गेल्या आठवड्यात मिंच्याचे अपहरण करुन समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोजवळ त्याचा डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला. संशयितांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कारंदवाडी (ता. वाळवा) येथे निर्जन ठिकाणी जाळला. त्याची रक्षा व हाडे कृष्णा नदीत फेकून दिली. याप्रकरणी आतापर्यंत मुख्य संशयित राहुल भोसले, सिद्धार्थ चिपरीकर व कवठेपिरान (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत सदस्य भागवत पाटील या तिघांना अटक केली आहे. सध्या तिघेही पोलिस कोठडीत आहेत. खून करण्यापूर्वी त्यांनी मिंच्याची चिता रचली होती. यासाठी सांगलीवाडीतून एका ‘वडाप’ गाडीतून लाकडे नेल्याची माहिती तपासातून पुढे आली होती. या वडाप चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. पण खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर तोही गायब झाला आहे. तो सापडल्यानंतर चिता रचण्यासाठी आणखी कोण होते, याचा उलगडा होणार आहे. या प्रकरणात आणखी तीन ते चार जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
संशयितांनी मिंच्याची ‘गेम’ केल्यानंतर त्याचा मोबाईल त्यांनी काढून घेऊन बंद केला. त्याचदिवशी त्यांनी हा मोबाईल बायपास रस्त्यावरील पुलावरुन कृष्णा नदीत फेकून दिला. तपासाच्यादृष्टीने हा महत्त्वाचा पुरावा असल्याने पोलिसांनी ‘जीवरक्षक’ टीमच्या मदतीने नदीत मोबाईलचा शोध घेतला. या कॅमेऱ्याच्या मदतीने मोबाईल पाण्यात पडल्याचे दिसून आले आहे. पण तो पंधरा ते वीस फूट अंतरावर आहे. तो काढण्यासाठी पाणबुड्यांची गरज आहे. पोलिसांनी महापालिकेकडे मदत मागितली होती. मात्र त्यांच्याकडे पाणबुड्यांची सोय नाही. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोबाईल पाण्यातच पडून आहे.
आता पोलिसांनी मुंबईतील पाणबुड्यांशी संपर्क साधला आहे. तसेच मिंच्याच्या अस्थींचा शोध घेण्यात आला. एक पोते व त्यामध्ये तीन-चार अस्थी सापडल्या आहेत. त्या मिंच्याच्याच आहेत का, याचा उलगडा करण्यासाठी पुढील तपासणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
गणेशोत्सव बंदोबस्ताचा तपासावर परिणाम
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्त करावा लागत असल्याने याचा परिणाम मिंच्याच्या खून तपासावर झाला आहे. अनेक बाबी तपासातून उजेडात आल्या आहेत, पण त्याचा तपास करण्यास पोलिसांना वेळ कमी पडत आहे. अजूनही खुनाचे मूळ कारण स्पष्ट झालेले नाही. पिस्तूल कोठून आणले होते, याचा उलगडा झालेला नाही. खुनाचा कट कुठे शिजला? आणखी कोणाचा सहभाग आहे? हेही निष्पन्न झालेले नाही.