लॉकडाऊनमध्ये साखरमाळांना दुप्पट भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:12+5:302021-04-11T04:26:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊनमध्ये माल पडून राहण्याच्या भीतीमुळे अनेक उत्पादकांनी कमी साखरमाळा तयार केल्या. तरीही मागणीत वाढ ...

लॉकडाऊनमध्ये साखरमाळांना दुप्पट भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊनमध्ये माल पडून राहण्याच्या भीतीमुळे अनेक उत्पादकांनी कमी साखरमाळा तयार केल्या. तरीही मागणीत वाढ झाल्याने व मालाची उपलब्धता कमी असल्याने गतवर्षाच्या तुलनेत साखरमाळांना यंदा लॉकडाऊनमध्ये दुप्पट भाव मिळाला.
मिठाईच्या दुकानांमधून व होलसेल व्यापाऱ्यांकडून साखरमाळांची विक्री केली जात आहे. गतवर्षी १०० रुपये किलो दराने विकल्या गेलेल्या साखरमाळांना यंदा २०० रुपये किलो भाव मिळाला आहे. त्यामुळे ज्या उत्पादकांनी माळा तयार केल्या त्यांच्यासाठी पाडव्याचा गोडवा यंदा वाढला आहे. गतवर्षी साखरमाळांच्या विक्रीस अडचणी आल्या होत्या. तसेच दरही फारसा मिळाला नसल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा होती. यंदा पाडव्याने उत्पादकांना साखरमाळेच्या दराचा गोडवा अनुभवास दिला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या राज्यभरात वाढत असल्याने लॉकडाऊन होणार, हे सर्वांनी गृहीत धरले होते, मात्र त्याचे स्वरूप काय असेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. कोणत्या गोष्टी सुरू राहणार, कोणत्या बंद राहणार, याचा अंदाज नव्हता. त्यामुळे साखरमाळा उत्पादकांनी दरवर्षीपेक्षा ४० टक्के कमी साखरमाळा तयार केल्या. काही उत्पादकांनी साखरमाळा तयारच केल्या नाहीत. अशातच निर्बंध व वीकेंड लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अचानक पाडव्याच्या माळांना मागणी वाढली. त्याची विक्री सुरू झाली. उपलब्धता कमी असल्याने दरवाढ झाली. सध्या बाजारात १८० ते २०० रुपये किलो दराने साखरमाळा विकल्या जात आहेत. पाडव्यापर्यंत यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
कोट
मागील वर्षीपेक्षा यंदा दर जास्त आहे; मात्र साखरमाळांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पुरवठा करताना अडचणी येणार आहेत. आतापासून अनेक विक्रेते माळांची मागणी करीत आहेत.
- ज्ञानेश्वर जाधव, साखरमाळा उत्पादक, सांगली