जिल्ह्याची वीज थकबाकी १४८० कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:49+5:302020-12-13T04:40:49+5:30
मार्च ते सप्टेंबर २०२० या कालावधित जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत दोन लाख ७५ हजारांनी वाढ ...

जिल्ह्याची वीज थकबाकी १४८० कोटींवर
मार्च ते सप्टेंबर २०२० या कालावधित जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत दोन लाख ७५ हजारांनी वाढ झाली असून, थकबाकीची रक्कम वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार ८०० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १८० कोटी आणि कृषिपंप दोन लाख ३३ हजार ४०० ग्राहकांकडे एक हजार ३०० कोटी अशा एकूण सहा लाख सहा हजार ग्राहकांकडे तब्बल एक हजार ४८० कोटींवर थकबाकी आहे. वीजग्राहकांना अनलॉकनंतर मीटर रिडिंगप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे. परंतु, लॉकडाऊनमधील वीजबिल ग्राहकांना जादा दिल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन केले होते. या कालावधित अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना वीजबिल भरणे शक्य नसल्यामुळे ते माफ करावे, अशी ग्राहकांची मागणी होती. शासनाने त्याबाबतीत ठोस निर्णय घेतला नाही. शेतीची वीज बिलांना काहीप्रमाणात सवलती मिळाल्या आहेत. पण, उर्वरित घरगुती, वाणिज्य ग्राहकांना कोणत्याही सवलती शासनाकडून जाहीर झाल्या नाहीत. वीज ग्राहक शासनाकडून होणाऱ्या सवलतीच्या प्रतीक्षेत असून, ती घोषणा होत नाही, तोपर्यंत महावितरणची थकबाकीचा प्रश्न सुटणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे.
चौकट
वीज खरेदीवर ८० टक्के खर्च
वीज ल वसुलीच्या सुमारे ८० टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. अनलॉकमुळे वाणिज्यिक वापर, रब्बी हंगाम, औद्योगिक उत्पादन आदींमुळे या महिन्यापासून प्रामुख्याने औद्योगिक, वाणिज्यिक व कृषिपंपांच्या वीजमागणीत मोठी वाढ होत जाणार आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीज खरेदीसाठी पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न महावितरणसमोर उभा असल्याचे अधिकाऱ्यांनी सागितले.