जि. प.वर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच
By Admin | Updated: June 17, 2016 00:25 IST2016-06-16T23:17:20+5:302016-06-17T00:25:24+5:30
मोहनराव कदम यांचा विश्वास : कडेगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात
जि. प.वर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच
कडेगाव : आता आमदार, खासदार होण्याची माझी अपेक्षा नाही. गेली ३५ वर्षे कॉँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले, याचे मला खूप समाधान आहे. जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी जिल्हाभर दौरा करणार आहे. प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्ते सक्रिय करणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मते मागायला फिरणार नाही. परंतु आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेवर कॉँग्रेसचा झेंडा फडकविणारच, असा विश्वास जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केला.
कडेगाव येथे आगामी नगरपंचायत नगरपालिका, पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी मोहनराव कदम बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या सरचिटणीस शैलजा पाटील, माजी आमदार हाफीज धत्तुरे यावेळी उपस्थित होते.
कदम म्हणाले, जो कार्यकर्ता दुसऱ्यांसाठी राबतो, तोच नेता होतो. गावोगावी कार्यकर्त्यांनी हिमतीने आणि ताकदीने पुढे आले पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती कॉँग्रेसचे सदस्य, तालुका आणि जिल्हा स्तरावरील कॉँग्रेसचे सदस्य, तसेच गावोगावी ग्रामपंचायती, तसेच सोसायट्यांचे कॉँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य, कारखाने आणि सूत गिरण्यांचे संचालक या सर्वांनी सक्रिय व सक्षमपणे काम करावे.
यावेळी प्रतीक पाटील म्हणाले, भाजपने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. ‘अच्छे दिन’ची जनतेला आशा दाखविली, पण आता कोणीही सुखी नाही. महागाई वाढली आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, नोकरदार सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे. कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियासह जनतेशी थेट संपर्क साधून आगामी निवडणुकांची तयारी करावी.
प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील म्हणाले, सरकारबद्दल असलेले नाराजीचे दृश्य मतांमध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे. सरकार काम करण्यामध्ये अपयशी होतंय. त्यांना सत्ता चालवायला जमत नाही. परंतु आपल्याला त्यांच्या चुकीच्या कारभाराला विरोध करायला जमले पाहिजे.
यावेळी कडेगाव तालुका कॉँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश जाधव, एन. एस. यु. आय.चे जिल्हाध्यक्ष राजीव मोरे, डॉ. जितेश कदम, नामदेव कस्तुरे, सत्यजित यादव, सतीश पाटील, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महिला कॉँग्रेसच्या राज्य सरचिटणीस शैलजा पाटील, माजी आमदार हाफीज धत्तुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सभापती आकांक्षा तांबेवाघ, उपसभापती सखाराम सूर्यवंशी, जि. प. सदस्य सुरेश मोहिते, वैभव गायकवाड आदी उपस्थित होते. स्वागत कडेगाव तालुका कॉँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मालनताई मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस सुनील जगदाळे यांनी केले. युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
मोहनशेठना न्याय मिळाला नाही : पाटील
पक्षाचे खरे काम मोहनशेठ कदम करतात. तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने ते कार्यरत आहेत. पक्षसंघटन कार्यासाठी जिल्ह्यात अविरतपणे त्यांनी कष्ट घेतले आहेत. मोहनशेठना कुठे तरी न्याय मिळायला हवा होता, अशी खंत कॉँग्रेसच्या राज्य सरचिटणीस शैलजा पाटील यांनी व्यक्त केली.