जिल्हा बँकेने कायद्याच्या चौकटीतच अडचणीतील संस्थांना मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:22+5:302021-09-14T04:32:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या संस्था अडचणीत असतील, तर त्यांची खासगी व्यक्ती किंवा संस्थांना ...

जिल्हा बँकेने कायद्याच्या चौकटीतच अडचणीतील संस्थांना मदत करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या संस्था अडचणीत असतील, तर त्यांची खासगी व्यक्ती किंवा संस्थांना विक्री करू नका. कायद्याच्या चौकटीत राहून जिल्हा बँकेने त्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी. सहकारी संस्था सभासदांच्याच मालकीच्या राहिल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्हा बँकेत सर्वांना बरोबर घेऊन काम करू, असे सांगत येत्या निवडणुकीत जुनाच फॉर्म्युला राबविण्याचे संकेत त्यांनी दिले.
जिल्हा बँकेच्या येथील विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सुरेश पाटील, झुंजारराव शिंदे, सी. बी. पाटील, किरण लाड, चिमण डांगे, कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील प्रमुख उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, दिलीपतात्यांच्या आग्रहामुळे कॉर्पोरेट पद्धतीची परिपूर्ण वास्तू उभारली गेली. ई-बँकिंगचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हे प्रमाण वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेने सगळे नियंत्रण स्वतःकडे घेतले आहे. देशातील अर्बन आणि स्थानिक बँका कमी करून फक्त चार-पाच बँकाच ठेवण्याची मानसिकता दिल्लीतील लोकांची आहे. भांडवलदारी जगात अधिक प्रगती होते, या मानसिकतेचा वर्ग निर्णय घेण्याच्या जागी बसला आहे.
ते म्हणाले की, यापुढील काळात काटेकोरपणे आणि कोणत्याही त्रुटी न ठेवता संस्था चालवाव्या लागतील, अन्यथा कारवाईची कुऱ्हाड कोसळणार हे लक्षात ठेवा. कोण कोणत्या पक्षात आहे याला महत्व देऊ नका. सहकारात राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवले पाहिजेत.
दिलीपतात्या पाटील म्हणाले की, काही माणसे बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी ईडी, आयकर विभागाचे काही चालले नाही. कोणीतरी तक्रार देते. त्याची हूल उठवली जात आहे. मात्र कसल्याही आणि कितीही चौकशा होऊ देत, त्याला तोंड देण्यास बँक समर्थ आहे. जयंत पाटील यांनी सांगितल्यानुसारच कारभार केला.
यावेळी प्रा. श्यामराव पाटील, श्रद्धा चरापले, कमल पाटील, चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब होनमोरे, उदयसिंह देशमुख, विजयकुमार पाटील, नेताजीराव पाटील, शुभांगी पाटील, अल्लाउद्दीन चौगुले उपस्थित होते.
तलवार भेट
जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केली. सहा वर्षांत कसा कारभार केला याचा लेखाजोखा मांडला. शेवटी त्यांनी जयंत पाटील यांना चांदीची तलवार भेट देत, ‘ही आता कुणावर कशी चालवायची ते बघा’, असे म्हणतात हशा पिकला. बँकेच्या इमारतीला लोकनेते राजारामबापू पाटील सहकार भवन आणि सभागृहाला जयंत पाटील यांचे नाव दिल्याचे त्यांनी जाहीर केले.