डोर्ली सोसायटीत अपहार
By Admin | Updated: June 30, 2014 00:38 IST2014-06-30T00:35:05+5:302014-06-30T00:38:48+5:30
११ जणांवर गुन्हा : १५ लाखांची अफरातफर; लेखापरीक्षकांनी दिली तक्रार

डोर्ली सोसायटीत अपहार
तासगाव : डोर्ली (ता. तासगाव) येथे डोर्ली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत सुमारे १५ लाख ८५ हजार ४०३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ११ जणांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विशेष लेखापरीक्षक अनिल सच्चिदानंद पैलवान यांनी आज रितसर फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष विलास बाबूराव पाटील, उपाध्यक्ष बापूसाहेब बळवंत पाटील, संचालक शामराव मलगोंड पाटील, छंदीक आण्णा पाटील, आनंदा नाना कोरे, जगू तात्या थोरात, हिंदुराव तानाप्पा मंडले, प्रकाश राजाराम पाटील, जगू बनू पाटील, कल्पना राजाराम शिंदे व सचिव तुकाराम शामराव पाटील या संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १७ डिसेंबर २०१३ ते २६ मार्च २०१४ या कालावधीत हे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. तशा सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या होत्या.
केंद्र शासनाने २००८ मध्ये कर्जमाफी जाहीर केली होती. ७ लाभार्थ्यांना ४ लाख ३७ हजार ७१५ ची कर्जमाफी देण्यात आलेली नाही. तसेच ११ सभासदांची अनामत रक्कम १ लाख ३ हजार ३५२ रुपये त्यांना न देता संस्थेत खोटे दप्तर तयार केले. १६ सभासदांची अनामत रक्कम जमा नसताना खोटे दफ्तर तयार करून ३ लाख ६४ हजार ११ रुपयांचा अपहार करण्यात आला. रोख रकमेत फरक करून बेरीज कमी, जास्त करून ३ लाख ७६ हजार ९१९ रुपयांचा अपहार केला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कौलगे शाखेत संस्थेच्या करंट खात्यावर खोट्या नोंदी करून २५ हजार ०८६ रुपये कर्ज खात्यात कीर्दमध्ये खाडाखोड करून १ लाख २० हजार ६८७ रुपये, व्याज, स्टेशनरीवरील खर्च संस्थेच्या नावे जादा टाकून १ लाख ३७ हजार ६३२ रुपये असा एकूण १५ लाख ८५ हजार ४०३ रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या फेरलेखापरीक्षणापूर्वी चाचणी लेखापरीक्षणही करण्यात आले आहे. अपहार झालेल्या रकमेपैकी ८ लाख ४१ हजार ३८९ रुपये सचिव तुकाराम पाटील यांनी भरणा केले असले, तरी त्यांचे कृत्य कारवाईस पात्र आहे, असे अनिल पैलवान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.केंद्रीय कर्जमाफी योजनेतून ४ लाख ३७ हजार ७१५, अनामत व्यवहारातून १ लाख ३ हजार ३५२, येणे अनामत रकमेतून ४७ हजार १५३, पोकळ अनामत येणेमधून ३ लाख १६ हजार ८५८, केंद्रीय कर्जमाफी जमा
खर्चातून १ लाख ६९ हजार ४१६, रोख शिल्लक फरकामधून ३ लाख ७६ हजार ९१९ अशा प्रमुख व अन्यप्रकारे एकूण १५ लाख ५ हजार ४०३ रुपयांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सचिवाने ठोस कागदपत्रे, पुरावे सादर केले नाहीत, तर संचालकांनी सर्व दोष हिशेबी कामकाजाचे आहेत, त्या कामकाजाचा आणि आमचा
काहीही संबंध नाही, असा
खुलासा लेखापरीक्षकांकडे केला असल्याचेही फिर्यादीत नोंद आहे. (वार्ताहर)