विंधन विहीरींच्या कामात अडचणी
By Admin | Updated: June 11, 2015 00:37 IST2015-06-10T23:08:01+5:302015-06-11T00:37:13+5:30
जलव्यवस्थापन समिती सभेत उघड : केवळ ७५ कामांना कार्यारंभ आदेश

विंधन विहीरींच्या कामात अडचणी
सिंधुदुर्गनगरी : पाणीटंचाईच्या २१५ मंजूर कामांपैकी आतापर्यंत केवळ ७५ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. मात्र संबंधितांकडून वेळीच जागेची बक्षिसपत्र करून मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या विंधन विहिरीच्या कामांना अडचणी येत असल्याची माहिती बुधवारी जलव्यवस्थापन समिती सभेत उघड झाली.
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह समिती सदस्य, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ५ कोटी ७५ लाखांचा तीन गावे ६५९ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा बनविण्यात आला आहे. यामध्ये पाणीटंचाईच्या प्राप्त प्रस्तावामधून प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या २१५ कामांपैकी आतापर्यंत केवळ ७५ कामांनाच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तर एकूण २१५ मंजूर कामांमध्ये १३७ विंधन विहिरी, १० विंधन विहिर दुरुस्ती, ३० विहिरीचा गाळ काढणे, ३० नळपाणी योजना दुरुस्ती व ८ तात्पुरत्या नळपाणी योजनांच्या कामांचा समावेश आहे. तर या कामांसाठी २ कोटी ३६ लाख ४८ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. ३६ विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी ३१ यशस्वी ठरली आहेत तर अन्य दुरुस्ती व गाळ काढण्याची कामे सुरु आहेत. विंधन विहिरीची कामे १३७ मंजूर असली तरी यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे बक्षिसपत्र वेळीच करून मिळत नसल्याने मंजूर होऊनही कामे रखडली आहेत. पाणीटंचाईच्या कामांची मागणी होत असली तरी स्थानिक पातळीवरून बक्षिसपत्र व अन्य कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहकार्य मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या कामात अडचणी येत असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
लघुपाटबंधारे विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यात १३८ लाखांची २२ कामे सुरु करण्यात आली आहेत. तसेच देवगड-विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या पाणीपट्टी वसुलीपेक्षा या योजनेवर खर्चच जादा येत आहे. त्यामुळे या योजना तोट्यात चालवाव्या लागत असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
जिल्ह्यातील १६४० पाणी नमुने तपासले असता त्यामध्ये ८१ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. मात्र या सर्व पाणीस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात आले असल्याची माहिती सभेत दिली. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा हागंदारीमुक्तीकडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही ३३ गावे हागंदारीमुक्त झालेली आहेत. त्यामध्ये काही कुटुंबांकडे शौचालय नाहीत. मात्र येत्या २ आॅक्टोबर रोजी जिल्हा हागंदारीमुक्त म्हणून जाहिर केला जाणार आहे. त्यासाठी शिल्लक काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देत त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन सभेत करण्यात आले.