धोंडिरामबापू माळी यांचे निधन
By Admin | Updated: June 11, 2014 01:04 IST2014-06-11T01:01:00+5:302014-06-11T01:04:29+5:30
देहदान : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी हरपला; जिल्ह्यावर शोककळा

धोंडिरामबापू माळी यांचे निधन
कुपवाड (सांगली) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सभापती धोंडिरामबापू तुकाराम माळी (वय ९६) यांचे आज, मंगळवार रात्री आठ वाजता येथील माळी गल्लीतील घरी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी नेत्रदान-देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा देह मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
धोंडिरामबापू अर्धांगवायूच्या आजाराने अनेक वर्षांपासून त्रस्त होते. सांगलीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. मात्र प्रकृती साथ देत नव्हती, त्यामुळे आठच दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री मदन पाटील यांनी निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. रात्री त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यांच्या पश्चात मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
स्वातंत्र्यसैनिकांचे आधारस्तंभ, शांतिनिकेतन परिवाराचे सदस्य आणि राष्ट्र सेवादलाचे सच्चे कार्यकर्ते अशी धोंडीरामबापूंची ओळख होती. कुपवाडमधील गरीब कुटुंबात ३० नोव्हेंबर १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. गरिबीवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते.
स्वातंत्र्य चळवळीची माहिती देणारी नियतकालिके वाचण्याच्या छंदातून ते या चळवळीकडे ओढले गेले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड यांच्यासोबत ते क्रांतीलढ्यात सहभागी झाले. धुळ्याच्या खजिन्याची लूट आणि ब्रिटिशांच्या धोरणास विरोध केल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून अटक करण्यात आली होती.
स्वातंत्र्यानंतर धोंडीरामबापूंनी स्वातंत्र्य सैनिक संघटनेसह सामाजिक कार्यात सहभाग घेतला. वसंतदादांच्या प्रभावामुळे ते काँग्रेसचे कट्टर समर्थक बनले. सामाजिक क्षेत्रात तरुणांना लाजवेल, असे त्यांचे कार्य होते. यामुळे त्यांना विविध सामाजिक संघटनांकडून गौरविण्यात आले होते. २००३ मध्ये सांगलीच्या विश्वजागृती मंडळातर्फे त्यांना ‘सांगली भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील झुंझार देशभक्त हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
रात्री उशिरा त्यांचे नेत्रदान झाले. उद्या सकाळी नऊच्या दरम्यान कुपवाड शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून, त्यानंतर त्यांचा देह मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
धोंडिरामबापूंचा जीवनपट
जन्म : ३० नोव्हेंबर १९१८
१९४१ मध्ये म. गांधी यांच्या परवानगीने कळंबी (ता. मिरज) येथे सत्यागृह. यामध्ये तीन महिने कारावासाची शिक्षा. येरवडा कारागृहात त्यांनी शिक्षा भोगली.
९ आॅगस्ट १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग. दोन वर्षे भूमिगत कार्य. दोन रेल्वेगाड्या पाडल्या, सहा रेल्वेस्टेशन पेटविली, सात ठिकाणी तारा तोडल्या.
गोव्यातून शस्त्रसाठा आणला. पोस्ट कार्यालय लुटले, रेल्वे पूल उडविला.
साडेपाच लाखांचा धुळे खजिना लुटल्याने बिटीश सरकारने त्यांना पकडण्यासाठी तीन हजाराचे बक्षीस जाहीर केले होते.
कवलापूर (ता. मिरज) येथे बॅ. जी. डी. पाटील यांच्यासोबत अटक. खजिना लूट व रिव्हॉल्व्हर बाळगल्याबद्दल सांगली संस्थानात खटला दाखल. रेल्वे पाडल्याच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता.
धुळे खजिना लुटल्याबद्दल सात वर्षे कारावासाची शिक्षा, मात्र १९४६ मध्ये सुटका.
१९४५ ते १९५० या काळात राष्ट्रसेवा दल संघटनेची बांधणी.
साक्षरता प्रचार व दारूबंदी प्रचार मोहिमेत पुढाकार.
१९५१ ते ५४ पर्यंत सांगली पालिकेत नगरसेवक.
१९७१ ते १९७४ पर्यंत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती व १५ वर्षे सदस्य.
१९५४ पासून स्वातंत्र्यसैनिक समितीचे सरचिटणीस. १ हजार ८०० स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन मिळवून देण्यात सहभाग.
सप्टेंबर २००८ मध्ये राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीच्या सभापतीपदी निवड. (वार्ताहर)