विकास आराखड्याला मुहूर्त नाहीच!

By Admin | Updated: May 24, 2016 00:55 IST2016-05-23T23:09:03+5:302016-05-24T00:55:24+5:30

इस्लामपूर नगरपालिका : सत्ताधारी-विरोधकांनी बनवला राजकारणाचा आखाडा

The development plan does not budge! | विकास आराखड्याला मुहूर्त नाहीच!

विकास आराखड्याला मुहूर्त नाहीच!

अशोक पाटील--इस्लामपूर--नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. गेल्या ३0 वर्षाहून अधिक काळ विकास आराखड्याचे घोंगडे भिजत पडले आहे. सत्ताधाऱ्यांतील काही दिग्गजांनी भूखंडाचे बेकायदेशीर श्रीखंड चवीने खाल्ले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नाचे सत्ताधाऱ्यांना काहीही देणे-घेणे नाही. याउलट विरोधकांतील काहींचे भूखंड विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आले आहेत. त्यासाठीच विरोधक आराखडा रद्द करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे विकास आराखडा राजकारणाचा आखाडा बनला आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादीने पालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च करुन नियोजित विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. या आराखड्यात राजकीय आकसापोटी विरोधी गटातील काही नेत्यांसह सर्वसामान्यांच्या भूखंडावर आरक्षणे टाकली आहेत. स्वत:चे भूखंड बेकायदेशीररित्या अधिकृत करुन त्याठिकाणी नागरी वस्त्याही केल्या आहेत. त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधक सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यापेक्षा, आराखडा स्वत:च्या हिताचा कसा बनेल याचाचा प्रयत्न करत आहेत.
गुंठेवारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वमालकीच्या घरात राहण्यासाठी बेकायदेशीर विनापरवाना घरे बांधावी लागत आहेत. उपनगरांत अशी हजारो घरांची बांधकामे झाली आहेत. या बांधकामांना नियमित करण्यासाठी इस्लामपूर पालिकेपुढे मोठे आव्हान आहे. भूखंडाची नोटरी करुन त्यावर बांधकाम करणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही बांधकामे जागेच्या खरेदीपासून बांधकाम नियमित करण्यापर्यंत मालमत्ताधारकांची पुरती दमछाक होत आहे.
सत्ताधाऱ्यांतील काही दिग्गजांनी अल्पदराने घेतलेल्या भूखंडाचे प्लॉट पाडून कोट्यवधींची माया गोळा केली आहे. या प्लॉट मालकांना दिलासा मिळावा म्हणून नियोजित विकास आराखड्यात त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून सत्ताधारी प्रयत्नशील आहेत, तर विरोधी गटातील काही दिग्गज नेत्यांच्या भूखंडावर आरक्षण टाकले आहे. ही आरक्षणे उठविण्यासाठी विरोधी गटातील नेते हा आराखडा रद्द करण्यासाठी मुंबईच्या वाऱ्या करु लागले आहेत.
तसेच काही विरोधी गटातील नेते आराखड्यातील काही आरक्षणे उठवून तो मंजूर करुन घेण्याच्या प्रयत्नात आहेत. एकूणच सत्ताधारी आणि विरोधकांच्या या भूमिकेमुळे विकास आराखड्याला मुहूर्त सापडणार नाही.

न्यायालयीन लढा देणार : विक्रम पाटील
सत्ताधारी राष्ट्रवादी विकास आराखड्याबाबत हतबल झाली आहे. ते न्यायालयीन लढा देण्याच्या तयारीत आहेत. त्याचा उपयोग होणार नाही. त्यांनी सत्तेच्या ताकदीवर सर्वसामान्यांना त्रास देण्याचा उद्योग केला आहे. त्याचा पश्चाताप त्यांना करावा लागणार आहे. विकास आराखड्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात आहे. योग्य वेळ आली की त्याचा निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिली.


सर्वसामान्यांच्या हिताचा आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशा पध्दतीने विकास आराखडा पालिकेच्या पातळीवर मंजूर करण्यात आला आहे. तो अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. आराखडा मंजूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष

Web Title: The development plan does not budge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.