पोलीस कोठडीतून दरोडेखोरांचे पलायन
By Admin | Updated: June 2, 2015 00:36 IST2015-06-02T00:36:17+5:302015-06-02T00:36:17+5:30
तासगावातील घटना : तिघेही पुसेगावचे; पोलीस दलात खळबळ

पोलीस कोठडीतून दरोडेखोरांचे पलायन
तासगाव : तासगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणारे तीन सराईत दरोडेखोर रविवारी मध्यरात्री कोठडी फोडून फरार झाले. जोरदार वारा, पाऊस आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचा फायदा घेत तिघांनी पलायन केले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात उशिराने आला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ
माजली आहे.
कुमार बधू पवार (वय २३), राहुल लक्ष्मण माने (१९), राजेंद्र प्रेमनाथ जाधव (२३, सर्वजण राहणार पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. जबरी चोरीच्या तपासासाठी आटपाडी पोलिसांकडून न्यायालयाने त्यांना तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. कोठडीची मुदत १ जूनपर्यंत होती. तत्पूर्वीच तिघांनी पलायन केले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके पाठविण्यात आली आहेत.
शिवाजी परसू सूर्यवंशी (रा. किंदरवाडी, ता. तासगाव) यांचे रस्त्याकडेला शेत आहे. १६ मे रोजी गाडीवरून जाणाऱ्या तिघांनी त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर सूर्यवंशी शेतात जात असताना, तिघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसडा मारून घेतली आणि तेथून पळून गेले. याबाबत सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांत दिघंची येथे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दरोड्याच्या प्रयत्नात असताना या तिघांना अटक केली.
त्यांची बातमी छायाचित्रांसह वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती. ती पाहून सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांत धाव घेऊन या तिघांनीच सोनसाखळी लंपास केली असल्याचे तासगाव पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तासगाव पोलिसांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. २६ मे रोजी हे तिन्ही आरोपी तासगाव पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले. तिघांना तासगाव न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
तासगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ब्रिटीशकालीन तुरुंग आहे. या तुरुंगातील एका कोठडीत या तिघांना ठेवण्यात आले होते. कैद्यांच्या बंदोबस्तासाठी हरिभाऊ कदम आणि पाटील हे दोन हवालदार तैनात होते. रविवारी रात्री जोरदार वादळी वारे आणि पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ही संधी साधून रात्री सव्वाबारा ते दीडच्या सुमारास तिघांनी व्हरांडा आणि कोठडीच्या कौलारू छतामध्ये असलेल्या लाकडी फळ्या उचकटल्या. त्यातून ते बाहेर गेले आणि व्हरांड्यावरील कौलांवरून खाली उड्या मारून फरारी झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांची पथके शोधासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
निवृत्तीची मेजवानी, आरोपींचे पलायन
तासगावचे पोलीस निरीक्षक रमेश बनकर, सहायक पोलीस निरीक्षक सयाजी गुजले यांच्यासह सहाजणांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम रविवारी (दि. ३१) सायंकाळी पार पडला. त्यानंतर रात्री खास मेजवानीचे आयोजन केले होते. याच रात्री आरोपींनी पलायन केल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.
दोन पोलीस निलंबित
तासगाव पोलीस ठाण्यात कोठडीबाहेर संशयितांवर नजर ठेवण्यासाठी हवालदार हरिभाऊ कदम व सुकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती.
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली.
दोघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश विट्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांना दिले आहेत. तीन गुन्हेगारांनी पलायन केल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याकडे सोपविला आहे.
शोधासाठी सहा पथके
पळून गेलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सहा पथके तत्काळ पाठविण्यात आली आहेत.
मणेराजुरी, किन्नरवाडी, पुसेगाव, कुमठे फाटा या परिसरात ही पथके पाठविण्यात आली आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पथके सातारा व कऱ्हाडला रवाना झाली आहेत. सातारा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.
पुसेगाव येथील त्यांच्या घरावरही छापे टाकले, मात्र ते घरी गेले नसल्याची माहिती मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यात ते आश्रय घेतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पथकांनी तिथे तळ ठोकला आहे.