कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार; आत्महत्यांचा दूर विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST2021-04-27T04:27:51+5:302021-04-27T04:27:51+5:30

सांगली : कोरोनाचे वादळ आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींचा ताकदीने सामना करीत त्याविरोधात लढण्याचा निर्धार लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच २०१८ ...

Determination to fight against Corona; Think away from suicides | कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार; आत्महत्यांचा दूर विचार

कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार; आत्महत्यांचा दूर विचार

सांगली : कोरोनाचे वादळ आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींचा ताकदीने सामना करीत त्याविरोधात लढण्याचा निर्धार लोकांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच २०१८ व २०१९ च्या तुलनेत कोरोनाच्या काळात आत्महत्येच्या प्रमाणात तब्बल ८ टक्क्यांनी घट झाली आहे.

सांगली जिल्ह्यात गेली वर्षभर कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात लॉकडाऊनमुळे महामंदीचे चटके हजारो लोकांना सोसावे लागले; पण या चटक्यांपेक्षा जगणे व कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची मानून अनेकांनी लढण्याचा निर्धार केला. त्याचेच सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. कोरोनाच्या संकटकाळातही जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या संकटामुळे आत्महत्येच्या मोजक्या घटना घडल्या, मात्र त्यानंतर सामाजिक संस्था, जिल्हा प्रशासन व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवण्यासाठी जनजागृती केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून आले.

चौकट

अशी आहे आत्महत्येची आकडेवारी

२०१८ ५९५

२०१९ ६१६

२०२० ५६७

चौकट

जीव माझा मोलाचा, आधार मी कुटुंबाचा

मिरजेतील मानसोपचारतज्ज्ञ चंद्रशेखर हळिंगळे यांनी सांगितले की, कोरोनाने अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या. ज्यांना लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागले त्यांना धावाधाव न करताही, कमी खर्चातही चांगले जगता येऊ शकते याची जाणीव झाली.

बाहेरचा ताण कमी होऊन कुटुंबाचे सुख, त्यांचे पाठबळ लाभल्यानेही लोकांचे मनोबल वाढले. सकारात्मक विचाराकडे त्यांची पावले पडली. जीव मोलाचा आहे व कुटुंबाला आपला आधार आहे, याचीही जाणीव प्रबळ झाली.

लोक व्यायाम करू लागल्याने त्यांचे शरीर व मनाचे आरोग्यही चांगले झाले

व्यसनांच्या आहारी जाऊन होणाऱ्या आत्महत्याही थांबल्या.

चौकट

कोरोनामुळे झालेल्या आत्महत्येने कार्यकर्ते हादरले

जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी मिरज तालुक्यातील दुधगाव येथे एकाने कोरोनाच्या उपचाराचे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली होती. या घटनेने जिल्हा हादरला. सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबाला मदत करतानाच अशा घटना घडू नयेत म्हणून जनजागृती केली. जून २०२० मध्ये आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एकाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली. सप्टेंबर २०२० मध्ये सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाने गळ्यावर धारधार चाकूने वार करून आत्महत्या केली. अशा सुमारे १० घटना जिल्ह्यात कोरोना काळात घडल्या.

Web Title: Determination to fight against Corona; Think away from suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.