राष्टÑवादीच्या बैठकीत दिनकरतात्या ‘टार्गेट’
By Admin | Updated: May 28, 2014 00:47 IST2014-05-28T00:47:25+5:302014-05-28T00:47:35+5:30
नव्या अध्यक्षांची मागणी : जयंत पाटील यांनी दिला सबुरीचा सल्ला

राष्टÑवादीच्या बैठकीत दिनकरतात्या ‘टार्गेट’
सांगली : राष्टÑवादी नगरसेवक व पदाधिकार्यांच्या आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या भाजपप्रेमाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. बैठकीत सर्वांनीच त्यांना लक्ष्य केल्यानंतर ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सर्वांना सबुरीचा सल्ला दिला. प्रदेशाध्यक्षांमार्फत योग्य ती कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सांगलीत पक्षाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. लोकसभा निकालानंतर जयंत पाटील यांनी पहिलीच बैठक घेतली. बैठकीत बहुतांश पदाधिकार्यांनी आणि नगरसेवकांनी दिनकर पाटील यांना लक्ष्य केले. पक्षाचा शहर जिल्हाध्यक्षच जर भाजपचे गोडवे गात असेल आणि त्यांच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असेल, तर आम्ही लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. अन्य नेत्यांवर पक्षशिस्तीचा भंग केल्यानंतर कारवाई करण्यात आली, तशीच कारवाई दिनकर पाटील यांच्यावर करण्यात यावी. त्यांना पक्षात रहायचे नसेल, तर त्याजागी दुसरा अध्यक्ष नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. पक्षविरोधी भूमिका घेणार्या या नेत्यांमुळे सर्वच पदाधिकार्यांकडे, नगरसेवकांकडे आघाडी धर्माच्या पालनाबाबत संशयाने पाहिले जात आहे. पक्षाला असे वातावरण चांगले नाही, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, ते तांत्रिकदृष्ट्या गेलेले आहेत, आता शारीरिकदृष्ट्याही भाजपमध्ये जातील. त्यांच्याबाबतचा निर्णय प्रदेश कार्यकारिणी घेईल. अशा गोष्टींमुळे पदाधिकार्यांनी, नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही. पक्षसंघटन वाढविण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. शाखा वाढविण्याबरोबरच लोकांचे प्रश्न सोडविणे, त्यासाठी पाठपुरावा करणे, जनसंपर्क वाढविणे यासारख्या गोष्टींचा अंगिकार करण्यात यावा. संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकार्याने, कार्यकर्त्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्रीनिवास पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, संजय बजाज, ताजुद्दीन तांबोळी, शरद लाड, योगेंद्र थोरात, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांनी दिनकर पाटील व अजितराव घोरपडे यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, माझ्या कानावर या गोष्टी आल्या आहेत. दिनकर पाटील यांच्याबाबतीत कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या असल्या, तरी त्यांच्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील. मला त्याबाबतचा कोणताही अधिकार नाही. पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो, त्यानुसार कारवाईची प्रक्रिया पार पडते. दिनकर पाटील अजून भाजपमध्ये गेलेत की नाही, हे मला माहीत नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना मी याबाबत विचारले होते. त्यावेळी त्यांनी मी राष्टÑवादीतच असल्याचे सांगितले होते. पक्षीय पातळीवर योग्य ती दखल घेतील. सध्या आमचे प्राधान्य पक्षसंघटन वाढीला आहे. (प्रतिनिधी)