दरीबडचीत पिके धोक्यात
By Admin | Updated: October 23, 2014 22:49 IST2014-10-23T21:22:12+5:302014-10-23T22:49:16+5:30
परतीच्या पावसाची पाठ

दरीबडचीत पिके धोक्यात
दरीबडची : परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके सुकू लागली आहेत. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी पुरेशी ओल व कडक ऊन यामुळे पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झाली नाही. शेतकरी त्या ठिकाणी पाणी पाजू लागला आहे. पाऊस झाला नाही तर दर हेक्टरी उत्पादनात घट होणार आहे.
रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात ज्वारी पीक घेतले जाते. त्याशिवाय करडई पाच हजार हेक्टर, सूर्यफूल ३ हजार १०० हेक्टर, गहू २ हजार ३०० हेक्टर, हरभरा २ हजार हेक्टर व मका ८०० हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. उर्वरित क्षेत्रात इतर गळीत धान्ये घेतली जातात.सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. कडक उन्हामुळे जमिनीतील ओल संपू लागली आहे. दुपारच्या वेळी पिके कोमेजू लागली आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. परंतु सध्या पावसाची पिकांना गरज आहे. परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता.
परंतु हवामान कोरडे झाले आहे. सकाळी दवबिंदू पडू लागले आहेत. त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकरी पिकांना पाणी पाजू लागला आहे. त्यामुळे ओढे, नाले, बंधारे, विहिरींतील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.पांदीतील शेतजमिनीमध्ये आता ओपसा आला आहे. शेतकरी नांगरणे, कुळवणे, मशागत आदी कामे करणार आहे. त्याठिकाणी गहू, खपली, हरभरा पिकांची पेरणी केली जाणार आहे. सध्याच्या अनुकूल वातावरणामुळे पिकांची उगवण चांगली होणार आहे. (वार्ताहर)
परतीच्या पावसाची पाठ
कडक उन्हामुळे जमिनीतील ओल संपू लागली आहे. दुपारच्या वेळी पिके कोमेजू लागली आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी पिकांची उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. परंतु सध्या पावसाची पिकांना गरज आहे. परतीचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु हवामान कोरडे झाले आहे.