शिराळ्यात साकारणार दाेन मियावकी जंगल प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:29+5:302021-01-08T05:28:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प ...

शिराळ्यात साकारणार दाेन मियावकी जंगल प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प समाविष्ट केले आहेत. प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून उभे राहिलेले हे दोन्ही प्रकल्प शिराळा शहरास वरदान ठरत आहेत.
शिराळा नगरपंचायत ही मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प ‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये समाविष्ट करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे.
जपानचे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावकी यांनी निश्चित केलेल्या पद्धतीनुसार हे प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये ६५ पेक्षा जास्त स्थानिक देशी प्रजातींच्या झाडांचा समावेश केला आहे. तसेच यामध्ये देशी औषधी, मसाल्याच्या, फळांच्या, फुलांच्या विविध जाती आहेत. तरी या प्रकल्पामध्ये एकूण १७०० पेक्षा जास्त झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प उभारणे आणि संवर्धनाचे काम प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील, उपाध्यक्ष प्रणव महाजन यांच्यामार्फत सातत्याने होत आहेत.
पहिला प्रकल्प डॉ. नितीन जाधव आणि दुसरा डॉ. दीपक यादव यांच्या खासगी जागेत उभारण्यात आला आहे. मियावकी जंगल प्रकल्पामध्ये शंभर वर्षांत तयार होणारे नैसर्गिक जंगल दहा वर्षांत तयार होते. २०१९ साली सुरू केलेल्या पहिल्या प्रकल्पातील सर्व झाडांची उंची वीस ते पंचवीस फूट इतकी आहे. २०२० साली सुरू केलेल्या दुसऱ्या प्रकल्पातील झाडांची उंची सहा ते सात फूट आहे. अत्यंत कमी कालावधीत झाडांची एकमेकांमध्ये स्पर्धा लावून हे जंगल शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले आहे. या जंगलामुळे शिराळा शहरातील वायू प्रदूषण घटण्यास मदत होत आहे, तसेच पक्ष्यांचा अधिवास तयार होणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणे, विहिरी, कूपनलिका यांना मुबलक पाणी उपलब्ध होणे, जमिनीची धूप थांबणे, सौंदर्यीकरण असे अनेक कायमस्वरूपी फायदे या मियावकी जंगल प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहेत.
यामुळे नगरपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नगरपंचायतीमार्फत मियावाकी जंगलाच्या संगोपनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा होत आहे. तसेच अशा प्रकारचे अनेक प्रकल्प राज्यात उभे रहावेत आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, असे मत नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.
फाेटाे : ०७ शिराळा २