तक्रारदारांच्या उसाला आले तुरे

By Admin | Updated: November 26, 2015 00:11 IST2015-11-26T00:11:56+5:302015-11-26T00:11:56+5:30

शेतकरी हतबल : कारखान्यांबद्दल नाराजी

Crowds of spotted grapefruit | तक्रारदारांच्या उसाला आले तुरे

तक्रारदारांच्या उसाला आले तुरे

अशोक डोंबाळे ल्ल सांगली
शासनाच्या निधीतून शेतकऱ्यांना एफआरपीची सर्व रक्कम देण्याऐवजी, काही कारखान्यांकडून ठेवीच्या नावाखाली प्रति टन १४७ रूपये कपात करून घेतली आहे. या कपातीस काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. या शेतकऱ्यांची रक्कम परत केली, पण सध्या या शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी ठेवी कपातीस विरोध केला, त्यांच्या उसाला तुरे आले तरीही, तो तोडून नेण्यास वाळवा तालुक्यातील कारखानदारांनी नकार दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रश्नावर शेतकरी संघटनांनी मात्र ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका स्वीकारली आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे ऊस वाळू लागला आहे. रासायनिक खते, मजुरीचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. या गोष्टीचा विचार न करता, साखर कारखानदार मात्र साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना एफआरपीपासून वंचित ठेवत आहेत. या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह अन्य संघटनांनीही आवाज उठविल्यामुळे राज्य शासनाने कारखानदारांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी बिनव्याजी पैसे देण्यास बँकांना हमी दिली. त्यानुसार प्रत्येक साखर कारखान्यास पैसेही वर्ग झाले. पण, साखर कारखान्यांनी आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून प्रति टनास ऊस उत्पादकांकडून १४७ रूपये ठेवीच्या नावाखाली कपात केली.
या कपातीस आष्टा, तुंग, समडोळी, मौजे डिग्रज, कवठेपिरान, दुधगाव, कारंदवाडी येथील काही शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी सहमतीपत्रही भरून दिले नाही.
या शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी पैसे दिले. पण, यावर्षीच्या गळीत हंगामासाठी नोंदणी करूनही संबंधित शेतकऱ्यांचा ऊस गाळपास नेण्यास नकार दिला आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांना विचारले असता, आम्हीच कपातीस विरोध करणाऱ्यांचा ऊस न तोडण्याची सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखानदार प्रशासनाच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे. उसाला चौदा महिने झाल्यामुळे तुरे आले आहेत. तरीही तो ऊस तोडला जात नाही.
‘वसंतदादा’कडून बिलच नाही : सुनील फराटे
सर्वोदय साखर कारखान्याकडून ऊस नेला जात नाही म्हणून शेतकरी वसंतदादा साखर कारखान्याकडे ऊस पाठवित आहेत. परंतु, वसंतदादा कारखान्याने या गळीत हंगामामध्ये आतापर्यंत १ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तरीही मौजे डिग्रज, तुंग भागातील एकाही शेतकऱ्याला दीड महिन्यात बिल मिळालेले नाही. कारखान्याकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. थोड्याच दिवसात देतो, एवढेच उत्तर मिळत आहे, अशी तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.
शेतकरी झाले हतबल
ज्या शेतकऱ्यांनी कपातीस विरोध केला नाही, त्यांचा ऊस तोडून नेला आहे. या भेदभावाबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शेतकरी संघटनाही गप्प असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेवटी शेतकऱ्यांची इच्छा नसताना अन्य कारखान्यांकडे ऊस जात आहे; पण तेथेही पैसे मिळत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: Crowds of spotted grapefruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.