सनमडीत कालव्याच्या पाण्याने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:16+5:302021-09-14T04:32:16+5:30
जत : सनमडी (ता. जत) येथील कालव्याला अचानक पाणी सोडल्याने सुमारे तीनशे ते चारशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. ...

सनमडीत कालव्याच्या पाण्याने पिकांचे नुकसान
जत : सनमडी (ता. जत) येथील कालव्याला अचानक पाणी सोडल्याने सुमारे तीनशे ते चारशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. केळी बागा, डाळिंब बागा, ऊस, उडीद, तूर, बाजरी, मूग, भुईमूग, आदी पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
कालव्याची खुदाई व अस्तरीकरण व्यवस्थित न करता ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडले होते. मार्च, एप्रिल, मेमध्ये सोडलेल्या पाणी आणि आता पावसाळ्यात सोडलेले पाणी सनमडी, घोलेश्वर, मायथळ येथील पिकात घुसले आहे. उन्हाळ्यात अनेक शेतांची मशागत करता आली नाही, तर ज्या शेतात पेरणी झाली तेथे आता पिकांचे नुकसान होत आहे. आठ महिन्यांपासून शेतकरी या समस्येचा सामना करीत आहेत.
कालव्यासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यात या पाण्याने नुकसान केले आहे. लवटे वस्ती येथे शेतकऱ्यांनी यापूर्वी काम बंद पडले होते. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तत्कालीन तहसीलदार सचिन पाटील, सुनील पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेटी देऊन काम सुरू करण्यास प्रयत्न केले होते.
या पाण्यामुळे दामाजी पवार, जोतिराम पवार, गुलाब पवार, श्यामजी पवार, शिवाजी पवार, जयवंत पवार, रामकृष्ण पवार, बाळू पवार, राजू बंडगर, श्रीशैल हुग्गु, गट्टू हुग्गे, बिरू हुग्गे, सुबराय काळे, मल्हारी काळे, संगांना पुजारी, बाळू नरुटे, बाळासाहेब कर्ले, आदींसह इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
चौकट
पंचनामे करण्याची मागणी
प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांना महिन्याभरपूर्वी लेखी निवेदन दिले होते. तरीही रविवारी रात्री अचानक कालव्याचे पाणी सोडल्याने पिके जमीनदोस्त झाल्या आहेत. या सर्व पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. तसेच कालव्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी दामाजी पवार यांनी केली आहे.
130921\1943-img-20210913-wa0041.jpg
कॅनॉलचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील ४०० एकर जमीन पाण्याखाली