कोरोना निर्बंधामुळे भाजीपाला दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:28+5:302021-04-12T04:23:28+5:30

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या कडक निर्बंधांचा भाजीपाला बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आठवडा बाजार बंद, त्यात नियमांमुळे ...

Corona restrictions increase vegetable prices | कोरोना निर्बंधामुळे भाजीपाला दरात वाढ

कोरोना निर्बंधामुळे भाजीपाला दरात वाढ

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या कडक निर्बंधांचा भाजीपाला बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आठवडा बाजार बंद, त्यात नियमांमुळे आवकेवर परिणाम झाल्याने सरासरी २० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद असल्याने किराणा मालासह फळांनाही अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुढीपाडव्याला आंब्याला असणारी मागणी लक्षात घेता, आंब्याची आवक किंचित वाढली आहे.

सध्या शहरात वाहनांमधूनच भाज्यांची विक्री हाेत आहे, तर फळविक्रेते रस्त्यावर असले तरी, नागरिकच बाहेर नसल्याने विक्रीवर परिणाम झाल्याने फळेही वाहनांतून विक्री केली जात आहेत. तरीही अपेक्षित ग्राहक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या आठवड्यात किराणा मालाचे दर स्थिर आहेत. पण आवकेवर परिणाम झाल्याने पुढील काही दिवसात दर वाढण्याची शक्यता आहे.

चौकट

भाज्या महागल्या

आठवडा बाजार बंद, त्यात कडक निर्बंध यामुळे सध्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामस्वरूप दरही वाढले आहेत. वांगी, दोडका, गवारीचे दर ६० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत, तर पालेभाज्या १५ रुपयांवर पोहोचल्या आहेत.

चौकट

फळांना मागणी कमी

बाजार बंद असल्याने फळ विक्रेत्यांना ग्राहक कमी आहेत. या आठवड्यात कलिंगड, टरबुजाची आवक चांगली होती. मात्र, विक्रेत्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही वाहनातून फळविक्री करण्यात येत आहे.

चौकट

किराणाचे दर स्थिर

नवीन गहू, तांदळासह इतर शेतीमाल सध्या बाजारात येत असला तरी, निर्बंधामुळे आवकेवर परिणाम झाला आहे. गव्हाचे दर काहीसे उतरले असले तरी, जुन्या गव्हाचे दर वाढलेलेच आहेत. अत्यावश्यक सेवेत किराणा दुकानदार असले तरी, या आठवड्यात अपेक्षित व्यवसाय झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोट

कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधामुळे सध्या व्यवसायावरच परिणाम झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात किराणा मालाचे दर स्थिर असून खाद्यतेलाची आवक मात्र, अपेक्षेपेक्षा कमी होत आहे.

- बापू सोनुरे, व्यापारी

कोट

लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला मिळत नाही. तसेच इतर कारणांसाठीही बाहेर पडता येत नाही. त्यामुळे मिळत असलेले साहित्य जादा दराने मिळत आहे.

- पूजा जाधव, गृहिणी

कोट

या आठवड्यात आंब्याची आवक वाढत आहे. मात्र, विक्रीसाठी ठेवूनही ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. आता गुढीपाडव्याला का होईना, ग्राहक मिळतील, अशी अपेक्षा आहे.

- रामचंद्र बने, फळविक्रेते

Web Title: Corona restrictions increase vegetable prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.