जिल्ह्यात कोरोनाने हिरावले १७५ बालकांवरील मायेचे छत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:30+5:302021-06-04T04:20:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाने कर्ताधर्ता माणूस हिरावल्याने अनेक कुटुंबांची पुढील वाटचाल खडतर बनली आहे. कमावता कुटुंब प्रमुख ...

जिल्ह्यात कोरोनाने हिरावले १७५ बालकांवरील मायेचे छत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाने कर्ताधर्ता माणूस हिरावल्याने अनेक कुटुंबांची पुढील वाटचाल खडतर बनली आहे. कमावता कुटुंब प्रमुख काळाच्या पडद्याआड गेल्याने ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. विशेषत: पालक हिरावलेल्या मुलांचे भवितव्य तूर्त अंधकारमय आहे.
पालक हरवलेल्या मुलांचे सर्वेक्षण जिल्हा बालसंगोपन विभागामार्फत केले जात आहे. कोरोनाने मृत झालेल्या साडेतीन हजार व्यक्तींची यादी विभागाला प्राप्त झाली आहे. त्यातील कितीजणांच्या पश्चात लहान मुले आहेत याची माहिती बाल संरक्षण अधिकारी घेत आहेत. शासकीय नियमानुसार १८ वर्षांखालील मुलांना संरक्षण दिले जाणार आहे. आजवरच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १७५ मुलांचे पालकत्वाचे छत्र हरवल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी काहींच्या वडिलांचे निधन झाले आहे, तर काहींनी आईला गमावले आहे. पाच मुलांचे आई आणि वडील असे दोन्ही पालक मृत झाले आहेत. आई मृत झालेली १७ तर वडील मृत झालेली १५३ मुले आढळली आहेत.
बाल संरक्षण विभागाने १८ वर्षांखालील निराधार मुलांचा शोध घेतला. पहिल्या टप्प्यात तरुण पालकांच्या कुटुंबातील मुलांची माहिती घेतली. पण काही वयस्क पालकांच्या घरीही लहान मुले असल्याचे आढळले. उशिरा अपत्यप्राप्ती झालेल्या किंवा वयस्क अवस्थेत मुले दत्तक घेतलेल्या पालकांच्या घरी अशी लहान मुले आढळली. पालकाच्या कोरोनाने झालेल्या मृत्यूनंतर ती निराधार झाली होती. सर्वेक्षण अद्याप सुरूच असून नागरिकांनी अशा मुलांची माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ व बाल संरक्षण अधिकारी ७९७२२१४२३६ यांच्याशी संपर्क करता येईल.
बॉक्स १
निराधार मुलांची तात्पुरती व्यवस्था
सर्वेक्षणादरम्यान आढळलेली काही मुले भारतीय समाज सेवा केंद्रात ठेवली आहेत. काही मुले शासकीय निरीक्षणगृहात तर काही मुलांना भगिनी निवेदिता केंद्रात ठेवले आहे. शासनाच्या पुढील निर्णयापर्यंत ती तेथेच राहतील.
बॉक्स २
अनधिकृत दत्तक टाळण्याकडे लक्ष
पालक हरवलेल्या मुलांची अनधिकृत दत्तक प्रक्रिया होऊ नये यावरदेखील प्रशासनाचे लक्ष आहे. राज्यभरात कोरोनाने मृतांची संख्या वेगाने वाढत गेली, तेव्हा अशा मुलांच्या दत्तकासाठी समाजमाध्यमांवर पोस्ट व्हायरल होत गेल्या. निराधार मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले, पण शासनाने या पोस्ट बेकायदेशीर ठरविल्या.
बॉक्स ३
सर्वेक्षणासाठी अंगणवाड्यांची मदत
निराधार बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मदत घेतती जात आहे. कोरोनाने मृत झालेल्या कुटुंबांपर्यंत त्या पोहोचत आहेत. शेजारच्या कुटुंबांनीही त्याची माहिती हेल्पलाईनवर, गावातील प्रशासनाकडे किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
रुग्णालयामध्येच फॉर्म भरून घेणार
रुग्ण मरण पावल्यानंतर त्याच्या बालकांच्या संगोपनाविषयी प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल होतानाचा रुग्णाकडून फॉर्म भरून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल होतानाच त्याच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जाणार आहे. कुटुंबातील अज्ञान बालकाचा ताबा कोणाकडे द्यायचा याचा तपशील रुग्णाकडून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिका आयुक्त व आरोग्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकाचे फलकही रुग्णालयात लावायचे आहेत. निराधार बालकांची जबाबदारी अन्य नातेवाईक घेतील काय किंवा बालगृहात दाखल करावे लागेल काय याची माहिती कृती दल घेणार आहे.
जिल्ह्यातील कोविडच्या रुग्णांचा आढावा
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १,२०,२६९
बरे झालेले रुग्ण १,०५,७८२
सध्या उपचार सुरू असलेले ११,००७
एकूण मृत ३,४८०
कोट
जिल्ह्यात कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील निराधार बालकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कोरोनास्थिती संपेपर्यंत सर्वेक्षण सुरूच राहणार आहे. त्यासाठी बालकल्याण विभागाची मदत घेतली आहे. निराधार बालकांविषयी कोणीही अनधिकृत व्यवहार करू नयेत. प्रशासनाला माहिती द्यावी. निराधार बालकांची सोय विविध सामाजिक संस्थांमध्ये केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. १८ वर्षांखालील मुलांची सर्वेक्षणात नोंद घेतली आहे. काही वयस्क पालकांच्या कुटुंबातही लहान मुले आम्हांला आढळून आली आहेत.
- बाबासाहेब नागरगोजे, बाल संरक्षण अधिकारी, सांगली