यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून जत नगरपालिकेत वादंग

By Admin | Updated: November 24, 2015 00:21 IST2015-11-24T00:16:52+5:302015-11-24T00:21:50+5:30

सत्ताधारी-विरोधी गटात राजकीय संघर्ष : सुविधा नगरपालिकेच्या, उत्पन्न प्रतिष्ठानला; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

The controversy in the municipality of Yatmala, on the pilgrimage of Yellamma | यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून जत नगरपालिकेत वादंग

यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून जत नगरपालिकेत वादंग

जयवंत आदाटे -- जत---येथील यल्लम्मा देवीची यात्रा भरविण्यावरून जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटात राजकीय सत्ता संघर्ष सुरू झाला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून ठोस भूमिका घेतली नाही तर ऐनवेळी यात्रा कालावधित किंवा यात्रेच्या पूर्वसंध्येला अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे.
यल्लम्मादेवी मंदिर व मंदिर परिसरात असलेली सुमारे सत्तर एकर जमीन संस्थानिक डफळे यांची खासगी मालमत्ता आहे. जत ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून तत्कालीन संस्थानिकांनी ग्रामपंचायतीला यात्रा भरविण्याचे सर्वाधिकार दिले होते. त्यातून ग्रामपंचायतीला काही प्रमाणात उत्पन्न मिळत होते व भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यात येत होत्या.
२०१२ मध्ये जत ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यापासून यल्लम्मादेवी प्रतिष्ठानच्यावतीने यात्रा भरविण्यात येत आहे. मागील तीन वर्षात यात्रेत येणारे पाळणे व इतर व्यावसायिकांना जागा देण्यावरून प्रतिष्ठान आणि गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी होऊ लागली आहे. भाविकांसाठी सर्व सुविधा नगरपालिका पुरवत आहे, परंतु प्रतिष्ठान सर्व उत्पन्न घेत आहे. यातून पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे, असा आरोप सत्ताधारी नगरसेवक करत आहेत, तर यात्रेची जागा प्रतिष्ठानची असून, मंदिरही त्यांच्या खासगी मालकीचे आहे. त्यामुळे यात्रा भरविण्याचा सर्वाधिकार प्रतिष्ठानला आहे, असा दावा नगरसेवक परशुराम मोरे यांनी केला आहे.
ही यात्रा दोन ते दहा जानेवारी २०१६ दरम्यान भरविण्यात येणार आहे. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अशी जत शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. यात्रेतील पाळणा, तमाशा व इतर ठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या जागा कोणाला मिळणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या जागेवर कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते.
जत ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून तत्कालीन संस्थानिकांनी यात्रा भरविण्यासाठी त्यांना परवानगी दिली होती. राजकीय द्वेषातून सूडबुद्धीने भाविकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी यात्रा भरविण्यात येईल, असा फार्स केला आहे. त्यांना कोणताही कायदेशीर अधिकार नाही. यात्रेची पूर्वतयारी केली असून, यासंदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी दिली आहे.

यात्रेसाठी : पालिकेची विशेष सभा
यात्रा भरविण्यासंदर्भात जत नगरपालिकेने विशेष सभा बोलाविली आहे. या सभेत ठराव संमत करून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी दिली.

Web Title: The controversy in the municipality of Yatmala, on the pilgrimage of Yellamma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.