माळेवाडी येथील परिस्थिती नियंत्रणात
By Admin | Updated: May 1, 2015 00:15 IST2015-04-30T23:46:21+5:302015-05-01T00:15:50+5:30
महाप्रसादातून ३५ जणांना विषबाधा : वैद्यकीय पथक तळ ठोकून

माळेवाडी येथील परिस्थिती नियंत्रणात
कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) जवळच्या माळेवाडी येथे मंगळवारी रात्री रेणुका देवीचा महाप्रसाद खाल्ल्यामुळे ३४ जणांना विषबाधा झाली होती. या घटनेने कोकरूड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून खळबळ उडाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, गुरुवारी यामध्ये एका रुग्णाची भर पडली आहे. दरम्यान, कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक माळेवाडी येथे तळ ठोकून परिस्थितीतवर लक्ष ठेवून आहे. रुग्णालयातील इतर सर्व १६ रुग्णांना बुधवारी सायंकाळी उपचार झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.
या गावातील रुग्णांना सलग तीन दिवस आवश्यक सलाईन व गोळ्या देण्यात येणार आहेत. गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. के. पाटील यांनी दिली. आरती संभाजी जाधव (वय २०) ही महिला मंगळवारी दाखल झाली होती. ती गुरुवारी सकाळी उलट्या सुरू झाल्याने उपचारासाठी पुन्हा कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने या घटनेत लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंगळवारी रात्री अकरा वाजता सुरू झालेली रुग्णांची गर्दी बुधवारी पहाटे चारपर्यंत होती. ३४ रुग्णांपैकी १७ रुग्णांना शिराळा व सांगली येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. त्यात पाच बालकांचा समावेश आहे. कागदोपत्री ३४ रुग्ण असले तरी, दीडशेच्या आसपास विषबाधा झाल्याचा अंदाज असल्याचे वैद्यकीय अधिकारी अजय कांबळे यांनी सांगितले. डॉ. एन. के. पाटील, डॉ. नरेंद्र घड्याळे, आर. बी. ठोंबरे, डी. आर. ढवळे, एस. बी. भोसले, एस. एस. देसाई, व्ही. बी. मराठे आदींनी रुग्णांवर उपचार केले. पाणी व अन्नाचे नमुने मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले आहेत, असे रुग्णालयातून सांगण्यात आले. लवकरच त्यासंदर्भात अहवाल मिळणार आहे. तो मिळाल्यानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
उलट्या, जुलाबाचा त्रास
महाप्रसादात भात, शिरा, आमटी, घुगऱ्या व अंबील यांचा समावेश होता. मंगळवारी सायंकाळी आठच्या दरम्यान महाप्रदासाचे वाटप करण्यात आले. तो कार्यक्रम रात्री दहापर्यंत सुरू होता. सुमारे २५० ते ३०० जणांनी प्रसाद खाल्ला. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास जवळजवळ सर्वांनाच उलट्या व जुलाब सुरू झाले.
बुधवारी सकाळी कॉँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, विकास नांगरे आदींनी रुग्णालयाला भेट देऊन रूग्णांना औषध उपचारासाठी मदत केली.
गुरुवारी सकाळी यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष सत्यजित नाईक, उपाध्यक्ष संजय घोडे, संचालक गजानन पाटील, तानाजी घोडे यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन अधिकाऱ्यांशी या संघटनेसंदर्भात चर्चा केली.