भारत इरकरकडून उलटसुलट माहिती
By Admin | Updated: September 12, 2016 00:05 IST2016-09-12T00:05:20+5:302016-09-12T00:05:20+5:30
कुडणूर हत्याकांड : चार दिवस कोठडी; पोलिसांनी माहितीबाबत पाळली गोपनीयता

भारत इरकरकडून उलटसुलट माहिती
डफळापूर : कुडणूर (ता. जत) येथील कुटुंबातील चौघांचे हत्याकांड करण्यामागच्या कारणाबद्दलचे गूढ कायम आहे. हत्या करून पोलिस ठाण्यात हजर झालेल्या भारत कुंडलिक इरकरने तपासात धक्कादायक, पण उलटसुलट माहिती दिली असल्याने पोलिसांनी कारणाबाबत गोपनीयता बाळगली आहे.
दोन मुलींसह आई व पत्नीची हत्या करून जत पोलिस ठाण्यात हजर झालेल्या भारत इरकरची रविवारी न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांच्या भीषण हत्येची छाया रविवारी दुसऱ्या दिवशीही कुडणूर गावात दिसत होती.
शेतजमिनीच्या वादात न्यायालयाने पकड वॉरंट बजाविल्यानंतर फरार असलेल्या भारत कुंडलिक इरकर याने शनिवारी आई, पत्नी व दोन मुलींची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. या भीषण हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात जमिनीची विक्री करण्यास आई व पत्नीने विरोध केल्याने भारतने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. हत्येनंतर जत पोलिसांत हजर झालेल्या भारतला रविवारी पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दि. १४ पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भारतने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली असली तरी, जबाबात तो पोलिसांना उलटसुलट माहिती देत आहे. यामुळे खुनाचे नेमके कारण काय, हा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
या घटनेने कुडणूर गाव सुन्न झाले आहे. माळकरी असलेला भारत कुटुंबाचा खून करेल, यावर ग्रामस्थांचा पहिल्यांदा विश्वास बसला नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये इरकर कुटुंब जगत होते. सावत्र आईच्या बाजूने जमिनीचा निकाल लागल्याने वैफल्यातून हे कृत्य केल्याचे त्याचे कुटुंबीय सांगत आहेत.
दरम्यान, भारत याची आई मृत सुशीला इरकर, पत्नी सिंधुबाई इरकर, मुली रूपाली व राणी यांच्यावर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज, सोमवारी होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे त्याची दोन्ही मुले म्हाळाप्पा व आकाश निराधार झाली आहेत. (वार्ताहर)
---------
तपासात धक्कादायक माहिती
रविवारी जतचे पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांनी कुडणूरमध्ये भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, भारत हा पोलिसांसमोर वेगळीच धक्कादायक माहिती सांगत आहे. तपास कामात अडथळा होईल म्हणून पोलिस माहिती देण्यास नकार देत आहेत.