नागरिक घरात, लॉकडाऊन जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:04+5:302021-04-11T04:26:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद भाजी मंडई, शटर डाऊन बाजारपेठा अशा वातावरणात वीकेंड ...

नागरिक घरात, लॉकडाऊन जोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद भाजी मंडई, शटर डाऊन बाजारपेठा अशा वातावरणात वीकेंड लाॅकडाऊनला सांगली शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकच नव्हे तर वाहनेसुद्धा बाहेर पडली नाहीत. त्यामुळे पोलिसांवर लॉकडाऊन काळात कोणताही ताण पडला नाही.
सांगली शहरात शुक्रवारी रात्री आठपासून सुरू झालेली शांतता शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीही कायम राहिली. सांगलीतील स्टेशन चौक, राजवाडा चौक, हरभट रोड, मारुती रोड, गणपती पेठ, कापड पेठ, स्टँड परिसर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, विश्रामबाग, शंभर फुटी रस्ता, कोल्हापूर रोड अशा सर्व ठिकाणी नेहमी नागरिकांची गर्दी असते. शनिवारी या परिसरात शुकशुकाट होता. रस्ते, चौक, भाजी मंडई सर्व ओस पडले होते.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकच बाहेर न पडल्यामुळे पोलिसांनी बसून राहणे पसंत केले. दुपारी काही वेळ पोलिसांनाही विश्रांती मिळाली. त्यामुळे शहर ओस पडले होते. वाहनेही रस्त्यावर फारशी दिसली नाहीत. रिक्षा, बस वाहतूक, खासगी प्रवासी वाहतून सर्व बंद होते. नागरिकही घरात राहिल्यामुळे अपवादाने रस्त्यावर वाहने दिसत होती.
चौकट
भाजी मंडईला कुलूप
सांगलीच्या जुन्या भाजी मंडईला कुलूप लावण्यात आले होते. याच परिसरातील फळविक्रेत्यांची दुकानेही बंद होती. फळांच्या विक्रीस लॉकडाऊनमध्ये परवानगी होती. मात्र, तरीही सर्वांनी बंदमध्ये सहभाग घेतला. शिवाजी मंडईतील दुकानेही कुलूपबंद झाली आहेत.
चौकट
दूध वितरणावर २० टक्के परिणाम
शहरातील दूध वितरणावर लाॅकडाऊनमुळे विपरीत परिणाम झाला. उपनगरांमध्ये होणाऱ्या दूध वितरणात २० टक्के घट झाली. दूध वितरकांनी सांगितले की, डेअऱ्यांकडून शहरात माल आला; पण शहरांतर्गत वितरणावर थोडासा परिणाम झाला. रविवारी तो सुरळीत होण्याची शक्यता आहे.
चौकट
ना दंड, ना वाद
दररोज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका व वाहतूक पोलिसांमार्फत दंड केला जातो. यावेळी अनेकदा वादावादीही होत असते. शनिवारी लॉकडाऊन काळात नागरिकच फारसे घराबाहेर न पडल्यामुळे ना कोणावर दंड करण्याची वेळ आली ना वादावादी झाली.
चौकट
पोलिसांवरील ताण कमी
नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले. त्यामुळे रस्त्यावर बंदोस्तासाठी आलेल्या पोलिसांना फार काही करावे लागले नाही. त्यांच्यावरील ताण कमी झाला. तरीही दिवसभर ओस पडलेले चौक व रस्ते पाहत त्यांना बंदोबस्त पार पाडावा लागला.