बायपास रस्त्यावरील वाहतूककोंडीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:46+5:302021-03-08T04:24:46+5:30
सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीवाडी, इस्लामपूर, पुण्याकडे जाणारी वाहतूक बायपास ...

बायपास रस्त्यावरील वाहतूककोंडीचे आव्हान
सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीवाडी, इस्लामपूर, पुण्याकडे जाणारी वाहतूक बायपास रस्त्यावर वळविली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला असून दोन ते तीन तास वाहतूक ठप्प होत आहे. ही वाहतूककोंडी फोडण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहे.
आयर्विन पुलावरील फुटपाथला तडे गेल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. महिनाभरासाठी या पुलावरील वाहतूक बायपास रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. सांगलीवाडीसह इस्लामपूरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी नियोजन करण्याची गरज आहे. शिवशंभो चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. त्याचप्रमाणे बायपासचा पूल, सांगलीवाडीकडून बायपासकडे येणाऱ्या रस्त्यावरही पोलीस तैनात करण्याची आवश्यकता आहे.
चौकट
सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत वाहतूक ठप्प होत आहे. या वेळेत वाहतूक पोलीस कुठेच दिसत नाहीत. त्यात दुचाकींची संख्या अधिक असल्याने चारचाकी वाहनांना मार्ग काढताना किरकोळ अपघात, वादावादीचे प्रसंग होत आहे. त्यामुळे आयर्विन पुलावरून दुचाकीला परवानगी देण्याची आवश्यकता आहे. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच
चौकट
आयर्विन पूल बंद झाल्यामुळे सांगलीवाडीकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आयर्विनवरून पादचारी व दुचाकी वाहनांना परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पण, सध्या केवळ पादचाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. दुचाकींनाही परवानगी दिल्यास बायपास रस्त्यावर होणारी कोंडी फुटेल. - अजिंक्य पाटील, नगरसेवक
चौकट
बासपास रस्त्यावरील शिवशंभो चौकात सकाळी व सायंकाळी वाहतूक पोलीस तैनात असतात. रात्री ९ वाजेपर्यंत त्यांची नेमणूक केली आहे. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक ट्रॅक्टरमुळे वाहनांची कोंडी होत आहे. त्यासाठी आजपासून रात्री १० वाजल्यानंतरच शहरातून ऊस वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे वाहतुकीवरील ताण बऱ्याचअंशी कमी होईल. - प्रज्ञा देशमुख, निरीक्षक वाहतूक शाखा, सांगली