पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून
By Admin | Updated: May 18, 2016 01:12 IST2016-05-18T01:12:39+5:302016-05-18T01:12:50+5:30
बंडगरवाडीतील घटना : सहाजणांविरुद्ध गुुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून
कवठेमहांकाळ : पूर्ववैमनस्यातून बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील अक्षय दत्तात्रय हांगे (वय २०) या तरुणाचा कोयता, चॉपरने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी सहा हल्लेखोरांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अनिल आप्पासाहेब बिसुरे, विलास यशवंत फासले (दोघे, रा. बंडगरवाडी), रणजित तानाजी फासले, श्यामराव यशवंत फासले, तानाजी यशवंत फासले (सध्या रा. कोल्हापूर), बळिराम यशवंत फासले (इचलकरंजी) यांचा समावेश आहे. अद्याप यातील कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
बंडगरवाडी येथे हांगे व फासले कुटुंबीय राहतात. गेले वर्षभर या दोन्ही कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद सुरू आहे. अधूनमधून एकमेकाला बघून घेण्याची भाषाही केली जात होती. सोमवारी सकाळी फासले कुटुंबातील एका लहान मुलाने हांगे यांच्या झाडाचा आंबा तोडला. यावरून सकाळी हांगे कुटुंबातील लोकांनी त्यांना जाब विचारला होता. त्यावेळी वस्तीवरील लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला होता. तरीही त्यांच्यात धुसफुस सुरू होती.
सायंकाळी पाच वाजता या वादाला पुन्हा तोंड फुटले. फासले कुटुंबातील अनिल बिसूर, विलास फासले, रणजित फासले, श्यामराव फासले, तानाजी फासले, बळिराम फासले या सहा संशयितांनी कोयता, चॉपरने अक्षयच्या हातावर, डोक्यावर, मानेवर हल्ला केला.
यावेळी विनायक हांगे, हेमंत हांगे यांच्यावरही हल्ला झाला. त्यामुळे भीतीने या दोघांनी अक्षयला तिथेच सोडून पळ काढला. हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला होता. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केले.
जखमी अक्षयला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अक्षयचा भाऊ विनायक यांने फिर्याद दिली आहे. खुनाच्या घटनेमुळे बंडगरवाडीत तणावाचे वातावरण आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर तपास करीत आहेत.
अक्षय सैन्यात भरती झाला अन्...
मृत अक्षय उंचापुरा होता. त्याला सैन्यात भरती व्हायचे होते. त्याने दोन महिन्यांपूर्वी सैन्य भरतीसाठी परीक्षाही दिली होती. परीक्षेत तो उत्तीर्णही झाला होता. भरती झाल्याचे पत्र सैन्य दलातून मंगळवारी सकाळी त्याच्या घरी आले; पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. घरच्यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.