जिल्ह्यात रक्ताच्या टंचाईने रुग्णसेवेला अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:14+5:302021-06-30T04:17:14+5:30
सांगली : बंद असलेली महाविद्यालये, थांबलेले कार्यक्रम, उत्सव अशा गोष्टींमुळे जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या ...

जिल्ह्यात रक्ताच्या टंचाईने रुग्णसेवेला अडथळे
सांगली : बंद असलेली महाविद्यालये, थांबलेले कार्यक्रम, उत्सव अशा गोष्टींमुळे जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातवाइकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत आहे. काही रक्तपेढ्यांत केवळ आठवडाभर पुरेल इतकाच रक्तसाठा असून शासकीय रुग्णालयातील रक्तसाठा केवळ दोन दिवसांपुरताच शिल्लक आहे.
जिल्ह्यात सध्या एकूण १८ रक्तपेढ्या आहेत. यातील बहुतांश रक्तपेढ्यांकडील सध्याचा रक्तसाठा काही दिवसांसाठी पुरेल इतकाच आहे. कोरोनापूर्वी व कोरोनानंतरच्या परिस्थितीत खूप मोठा फरक पडला आहे. जिल्ह्यात नेहमी उत्सव, वाढदिवसाचे कार्यक्रम, जत्रा, यात्रा यानिमित्त रक्तदान शिबिरे होत होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडूनही स्वेच्छा रक्तदानाचे प्रमाण अधिक होते. कोरोना काळात या सर्व गोष्टी ठप्प झाल्या. उत्सव, कार्यक्रम बंद झाले. त्यामुळे त्यानिमित्ताने होणारी शिबिरे थांबली. महाविद्यालये बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांकडून नियमितपणे होणारे रक्तदान थांबले आहे. लसीकरणामुळे दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने त्याचाही परिणाम रक्तदान घटण्यावर झाला आहे.
काेरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यातच रक्ताच्या तुटवड्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे. त्यामुळे लोकांनी रक्तदान करण्याची मोठी गरज सध्या निर्माण झाली आहे.
चौकट
रक्ताची मागणी वाढली
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. त्यांनाही प्लाझ्माची गरज भासत आहे. याशिवाय काळ्या बुरशीचा आजार बळावत आहे. त्या रुग्णांनाही प्लाझ्मा आवश्यक असतो. याशिवाय कर्करोग, थॅलेसेमिया, शस्त्रक्रिया, अपघातातील रुग्ण यांनाही रक्ताची गरज आहे. कोरोना काळात रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत पुरवठा कमी झाला आहे.
चौकट
शासकीय रक्तपेढीतही टंचाई
रक्त संक्रमण अधिकारी वाय. सी. शेंडे यांनी सांगितले की, सांगली व मिरजेत असणाऱ्या शासकीय रक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा आहे. सांगलीतील पेढीत केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. दैनंदिन रक्तसंकलनात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. थॅलेसेमियाचे जिल्ह्यात दोनशेहून अधिक रुग्ण आहेत. त्यांनाही रक्त देताना अडचणी येत आहेत. केवळ अत्यावश्यक उपचारासाठी आता पुरवठा सुरू आहे. एबी गटातील पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रक्ताची टंचाई मोठी आहे.
सिद्धिविनायक रक्तपेढी
मिरजेतील सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालयातील रक्तपेढीतही आठवडाभराचाच साठा शिल्लक आहे. वर्षभरात सहा ते आठ हजार पिशव्या रक्तसंकलन कोरोनापूर्वी होत होते. ते प्रमाण घटले आहे. त्यामुळे सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कर्करुग्णांना प्लेटलेट्सची मोठी गरज भासते. त्यामुळे अडचणी येत आहेत, अशी माहिती रक्तपेढीचे जितेंद्र पत्की यांनी दिली.