कवठेमहांकाळ : म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बुधवारी कवठेमहांकाळ शहर बंद केले. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसैनिकांनी निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना मागणीचे निवेदन दिले. सध्या जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत; परंतु शासनाला जाग येत नाही. शासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहोत. या शासनाला धडा शिकवू, असे निवेदनात म्हटले आहे. वीज बिल भरल्यानंतर पाणी सोडू, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. परंत, या नेत्यांनी शेतीला पाणीच दिले नाही. तालुक्यातील पिके करपून गेली आहेत. शेतकरी दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना, भाजप वीज बिल भरण्याची सक्ती करीत आहे. ही शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका असून पाणी सोडल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. आठ दिवसांत पाणी सोडले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला. व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिला. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी संजय चव्हाण, प्रकाश चव्हाण, महेश जाधव, अनिल बासर, गुंडा पोतदार, अनिल पाटील, रोहित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
कवठेमहांकाळ कडकडीत बंद
By admin | Updated: December 24, 2015 00:36 IST