तासगावात भाजपचे कमळ ठेकेदारीच्या चिखलात
By Admin | Updated: May 11, 2016 00:51 IST2016-05-10T23:04:13+5:302016-05-11T00:51:00+5:30
काँग्रेसचा निशाणा : नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराने खासदारांच्या महत्त्वाकांक्षेला तडा

तासगावात भाजपचे कमळ ठेकेदारीच्या चिखलात
दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिकेत पाच महिन्यांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांनी मोठ्या महत्त्वाकांक्षेने भाजपचे कमळ फुलवले. भाजपच्या सत्तेचा कारभार पाहिल्यानंतर मात्र भाजपचे कमळ ठेकेदारी आणि गटबाजीच्या चिखलात अडकून पडल्याचे दिसून येते. बहुमतासाठी पक्षप्रवेशाची केलेली गोळाबेरीज, नगरसेवकांची संकुचित मानसिकता यामुळे खासदारांच्या महत्त्वाकांक्षेला तडा गेल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपवर होत असलेली राजकीय चिखलफेक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. या घडामोडीत काँग्रेसने मात्र भाजपवर अचूक निशाणा साधण्यात यश मिळवले आहे.
खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्ह्याचे नेतृत्व हातात आल्यानंतर, मोठ्या महत्त्वाकांक्षेने तासगाव पालिकेत सत्तांतर घडवून आणले. भाजपचा झेंडा फडकलेली पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पालिका म्हणून राज्यातील भाजपच्या नेत्यांनी कौतुक केले. भाजपच्या सत्तेचा श्रीगणेशा राष्ट्रवादीतून आलेल्या नगरसेवकाला नगराध्यक्षपद देऊन झाला. सत्तेत येण्यासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर जुळवण्यासाठी खासदार संजयकाकांनीदेखील काही तडजोडी केल्या. राष्ट्रवादीच्या एका गटाचा बाहेरुन पाठिंबा मिळवला. किंंबहुना यापूर्वी ज्यांच्या कारभारावर जाहीर टीका केली, अशांनादेखील पक्षात घेऊन सन्मान दिला.
सत्तेसाठी राजकीय तडजोडी करुन पालिकेत भाजपचे कमळ फुलविले. मात्र सत्तेत आल्यानंतर आजअखेर कसरत करावी लागत असल्याचेही चित्र आहे. सहा महिन्यांच्या कालावधित तिसऱ्यांदा नगराध्यक्ष निवड झाली. नगराध्यक्षांच्या संगीत खुर्चीबाबत लोकांची नाराजी आहे. तरीही केवळ नगरसेवकांची नाराजी राजकीय वाटचालीत अडसर ठरू नये, यासाठी संगीत खुर्चीचा खेळ कायम ठेवण्यात आला. पालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर खासदारांनी शासनदरबारी वजन वापरुन अनेक नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. शहरातील प्रत्येक प्रभागात विकासाचे नारळ फुटले. जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न कायम ठेवले. मात्र खासदारांच्या पालिकेतील काही शिलेदारांनी या निधीवरच डोळा ठेवण्याचे काम केले. काही नगरसेवकांनी नातेवाईकांच्या नावावर ठेकेदारी केली. काहींनी टक्केवारीवर जोर धरला. त्यातूनच कायदा हातात घेणाऱ्या काही घटना चव्हाट्यावर आल्या. एकीकडे कारभाऱ्यांची ठेकेदारी सुसाट असतानाच, दुसरीकडे काही कारभाऱ्यांनी पालिकेच्या
आरक्षित जागा ढापल्याचे उद्योगही चव्हाट्यावर आले.
निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपच्या कारभाऱ्यांचे चव्हाट्यावर येणारे कारनामे, सत्तेत आल्यापासून सुरू असलेली अंतर्गत कुरघोडी यामुळे भाजपच्या सत्तेचे कमळ राजकीय चिखलात रुतत चालल्याचे दिसून येत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात स्पष्ट सहभाग नसला तरी देखील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. विरोधी काँग्र्रेसने या घटनांवर बोट ठेवत, भाजपवर अचूक निशाणा साधला आहे. तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्याकडून रोज एक मुद्दा उकरुन काढून भाजपवर हल्लाबोल करण्याचे काम सुरु आहे. या घटनांनी भाजपच्या सत्तेवर तूर्तास काही परिणाम होणार नाही. मात्र तोंडावर असलेल्या निवडणुकीतील जनमताचा कौल यावर ठरणार आहे, हे निश्चित.
मतभेद चव्हाट्यावर : खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष
भाजपचे जहाज मजबूत आणि सत्तेच्या लाटेवर स्वार असल्याने राष्ट्रवादीच्या जहाजातून काहींनी त्यात प्रवेश केला. हा प्रवेश काही जुन्या भाजपेयींना खटकत होता. मात्र सत्तेच्या समीकरणासाठी असलेल्या गरजेमुळे हा प्रवेश झाला. अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले. आम्ही स्वच्छ आहोत, बाहेरून आलेल्यांची प्रतिमा डागाळलेली आहे, असा सूर लावला. जुन्या, नव्यांचा सूर जुळेना. काहींनी नव्यांशी सूर जुळवला, त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांतही कलह सुरू झाला. यामुळे भाजपची नौका हेलकावे खात आहे. ही नौका आगामी निवडणुकीत यशस्वीपणे किनाऱ्याला लावण्यासाठी खासदार संजयकाका कोणते कसब वापरतात, यावरच सर्व अवलंबून आहे.
राष्ट्रवादी भरकटलेली
पालिकेच्या सत्तेत आल्यानंतर भाजपने राज्य, केंद्राच्या सत्तेचे मार्केटिंग केले. विकास कामांच्या माध्यमातून तासगावकरांना येणाऱ्या निवडणुकीत पर्याय नसल्याचे बिंंबवण्यात यश मिळवले होते. भाजपकडे सत्ता आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व आहे. इच्छुकांच्या लांबलचक यादीत कर्तृत्ववान उमेदवारांचा भरणा आहे. या साऱ्या गोष्टी येणाऱ्या निवडणुकीत भाजपसाठी बेरजेच्या ठरणाऱ्या आहेत. मात्र सत्तेत आल्यापासून ठेकेदारी, नियमबाह्य कामकाज, कुरघोडीचे राजकारण अशा काही वजाबाकी करणाऱ्या गोष्टी आहेत. काँग्रेसने त्याचे मार्केटिंग करुन भाजपचे निगेटीव्ह चित्र उमटविण्यात यश मिळवले आहे. सत्ताधाऱ्यांचा कारभार असाच राहिला, तर त्याची किंंमत मोजावी लागेल, हे नक्की.
भाजपची बेरीज-वजाबाकी
भाजपच्या अंतर्गत कुरघोड्यांचा फायदाकाँग्रेसचे महादेव पाटील यांनी करून घेतला आहे. भाजप आणि खासदारांवर राजकीय हल्लाबोल करून निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. दुसरीकडे सत्तेतून पायउतार झालेले राष्ट्रवादीचे कारभारी मात्र अद्यापही सैरभर झालेले असून, पालिकेच्या कारभाराकडे दुरुन पाहण्याचेच काम केले जात आहे. सैन्य असूनही खमक्या सेनापती नसल्यामुळे शहरातील राष्ट्रवादी भरकटल्याचे चित्र दिसून येत असून, हे भाजपच्या पथ्यावर पडणारे ठरले आहे.