‘स्वाभिमानी’त फूट पाडण्याची भाजपची खेळी
By Admin | Updated: May 26, 2015 00:55 IST2015-05-25T23:44:15+5:302015-05-26T00:55:50+5:30
निवडीला काहींचा विरोध : सदाभाऊंऐवजी राजू शेट्टी यांना मंत्रीपद देण्याच्या हालचाली

‘स्वाभिमानी’त फूट पाडण्याची भाजपची खेळी
अशोक पाटील -इस्लामपूर -जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याचे लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. परंतु त्यांच्या या निवडीला काहींचा विरोध आहे. याला पर्याय म्हणून खासदार राजू शेट्टी यांना केंद्रातील राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या खेळ्या भाजपच्या काही नेत्यांच्यातून सुरू आहेत. यामागे फक्त स्वाभिमानी संघटनेत फूट पाडण्याचाच कट रचला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच राजू शेट्टी हे विजयी होणार, याची खात्री पटली होती. ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून परिचित असल्याने त्यांना देशाचे कृषीमंत्री पद मिळणार, अशी हवाही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पसरवली होती. यासाठी राजू शेट्टी यांनी दिल्लीत तळही ठोकला होता. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत शेट्टी यांची कोणीही दखल घेतली नाही. लोकसभा निवडणुकीतच स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हाढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांना कडवी झुंज दिली. खोत यांचा निसटता पराभव झाला असला, तरी त्यांचे भाजप नेत्यांनी मोठे कौतुक केले. याचेच बक्षीस म्हणून खोत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी खलबते झाली. परंतु यालाही बराच कालावधी गेल्याने खोत यांनी नाराजी व्यक्त करून भाजप सरकारवर तोफ डागली. उसाच्या एफआरपीवरून भाजप सरकार आणि स्वाभिमानी संघटनेतील दरी रुंदावेल का? अशीही हवा होती. परंतु दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाच्या लालसेपोटी ऊसदर आंदोलनाची आक्रमकता कमी केली. परंतु ज्या ऊस उत्पादकांच्या जिवावर निवडून आले, ते शेतकरी मात्र संघटनेवर नाराज झाले आहेत.
सदाभाऊ खोत हे शिराळा मतदारसंघातील नेते आहेत. याच मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदाचा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचाराच्या सभेत दिला होता. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी परिषदेत गडकरी यांनी पुन्हा एकदा आ. नाईक यांना मंत्रीपद देण्याचा पुनरुच्चार केला आहे. एका मतदारसंघात दोन मंत्रीपदे देण्यापेक्षा खोत यांच्याऐवजी शेट्टी यांना केंद्रात स्थान दिल्यास त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करता येईल, अशी चर्चा आहे. भाजपला स्वाभिमानी संघटनेत फूट पाडण्याची राजकीय खेळी असण्याची शक्यता आहे.
आपणास मंत्रिपदाची संधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. याचा निर्णय लांबणीवर पडत असल्याने शांतता बाळगली आहे. माझ्याऐवजी राजू शेट्टी यांना मंत्रीपद देण्याच्या हालचालीबाबत आपणास काहीही माहीत नाही. त्यांना संधी मिळाल्यास मला आनंदच होईल.
- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना